मुंबई : मुंबई क्रिकेट संघात पृथ्वी शॉला कायम ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या सरावाच्यावेळी त्याच्या तंदुरुस्तीबाबत शंका घेतली जात असतानाच त्याला मुंबई क्रिकेट संघटनेने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पृथ्वी संघात असल्याने या चर्चेला सध्या तरी विराम मिळाला.
मुंबईने सलामीच्या लढतीत बडोद्यास पराजित केले होते. त्यानंतर संघाने ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष झाला होता. त्यावेळी मर्यादा ओलांडल्या गेल्याची चर्चा होती. याबाबत मुंबई खेळाडूंसोबत मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. आता त्यातच पृथ्वी शॉ, एकनाथ केरकर आणि मार्गदर्शक विनायक सामंत यांना शिस्तपालन समितीने चौकशीसाठी बोलावले असल्याची चर्चा सुरू झाली.
आम्ही कोणालाही चौकशीसाठी बोलावले नव्हते. निष्कारण अफवा पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही रेल्वेविरुद्धच्या लढतीसाठी संघही जाहीर केला आहे, असेही सांगितले.
मुंबई रेल्वे लढत 25 ते 28 डिसेंबरदरम्यान वानखेडे स्टेडियवर होणार आहे. या लढतीसाठी सिद्धेश लाडने मुंबई संघात पुनरागमन केले आहे. तो विवाहामुळे सलामीच्या लढतीत खेळला नव्हता.
मुंबई संघ ः सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिश्ता, शुभम रांजणे, आकाश पारकर, सिद्धेश लाड, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तार्डे, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, दीपक शेट्टी, एकनाथ केरकर.
|