प्रिटोरिया : खरे तर सेंच्युरियनची खेळपट्टी ४०० धावा केल्या जातील इतकी पोषक नव्हती. गोलंदाजीस सहायक असलेल्या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची, हे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. आमच्याकडे जसप्रीत बुमराला दुसऱ्या बाजूने योग्य ती साथ मिळाली नाही, अशा शब्दांत भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर गोलंदाजांबाबत निराशा स्पष्ट केली.
१९ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाने अंतिम सामन्यात अपेक्षित खेळ केला नाही आणि विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. त्या निराशेतून बाहेर यायचा प्रयत्न करत होता तोपर्यंत दुसरा धक्का त्याला बसला.
पाच वेळा आयपीएल जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला १८ डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने बाजूला करून हार्दिक पंड्याला कप्तान बनवले. तो धक्का पचतो न पचतो तोच तिसरा धक्का कप्तान नात्याने रोहित शर्माला बसला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोरचा पहिला कसोटी सामना डावाच्या फरकाने गमावला आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामना गमावल्यावर रोहित शर्मा पत्रकारांशी वार्तालाप करायला आला तेव्हा त्याचे डोळे दु:खाची छटा स्पष्ट दाखवत होते. संपूर्ण सामन्यात आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही.
फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही प्रांतात अपयश आले. खेळपट्टी गोलंदाजांना सतत काही ना काही मदत करत होती; पण आम्ही इतक्या कमी धावा करणे अपेक्षित नव्हते. धावा करणे अशक्य नाहीये, हे केएल राहुलने दाखवून दिले.
अशा खेळपट्टीवर प्रत्येक फलंदाजाने आपापले गुण आणि बलस्थाने ओळखून धावा जमा करायची योजना आखायला हवी. आम्ही फलंदाजी करताना तंत्रशुद्धपणा दाखवला नाही, असे फलंदाजीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला.
गोलंदाजीबद्दल मत मांडताना रोहित शर्मा म्हणाला, बुमराला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. एका गोलंदाजावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. इतरांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून हे शिकण्यासारखे आहे, असे रोहितने सांगितले.
तीन फलंदाज आणि काही गोलंदाज दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी सामना खेळत होते ज्याचा आणि भारतीय संघाने सराव सामने न खेळण्याचा विपरीत परिणाम झाला का, असे विचारता रोहित शर्मा म्हणाला, मला तो मुद्दा पटत नाही. त्यांच्या संघातही काही खेळाडू पदार्पण करत होते; पण त्यांनी योग्य कामगिरी केलीच ना?
आणि सराव सामन्याचा जास्त फायदा होत नाही, असा आमचा अनुभव आहे. कारण सांगतो, सराव सामन्याला दिली जाते त्या खेळपट्टीत जान नसते आणि गोलंदाज वेगाने मारा करणारे नसतात. ज्याने कसोटी सामन्याची खरी तयारी होतच नाही. मग सराव सामना खेळून काही फायदा होत नाही. म्हणून आम्ही तसे वातावरण निर्माण करून सराव करणे पसंत करतो.
पराभवाचा फटका बसल्याने हादरलेला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी काय आणि कशी तयारी करणार, हा प्रश्न आहे. पत्रकार परिषदेत किंवा बाहेर बोलताना चुका कबूल करायला नकार देणारे भारतीय संघ व्यवस्थापन संघाच्या बैठकीत तरी खराब कामगिरी केलेल्या खेळाडूंनी अत्यंत स्पष्ट शब्दात कान उघडणी करणार की नाही, हा सवाल मनात येत आहे.
भारतीय संघाने परदेश दौऱ्यात चांगली कामगिरी करायची तयारी दाखवली आहे आणि गेल्या काही परदेश दौऱ्यांत भक्कम खेळ करून कसोटी सामने जिंकले आहेत. तेव्हा केपटाऊन कसोटीत भारतीय संघ चुका सुधारून चांगला खेळ करेल, अशी ग्वाही रोहित शर्माने दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.