विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कॅप्टन्सीचे सर्वोत्तम रेकॉर्ड आपल्या नावे असताना अचानकपणे किंग कोहलीने कसोटी कॅप्टन्सीला रामराम ठोकला. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात निवेदन दिले. विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी हा निर्णय मोठा धक्काच होता. विराट कोहलीच्या या निर्णयामागे बीसीसीआयच काहीतरी डाव असल्याच्या प्रतिक्रिया विराट समर्थकांकडून पाहायला मिळत आहेत. दरम्यान क्रिकेटच्या देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीनं घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीये. (Sachin Tendulkar reacts on Virat Kohli quitting Test captaincy)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीच्या या निर्णयासंदर्भात आदर व्यक्त केलाय. भारतीय संघाचे नेतृत्व करताना तू यशस्वी कामगिरी करुन दाखवली आहेस. तू नेहमीच 100 टक्के क्षमतेनं योगदान दिले आहेत, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टरने विराट कोहली यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले आहे. यशाचा सर्वोच्च टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीचे त्याने अभिनंदनही केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकरशिवाय युवराज सिंग आणि अन्य क्रिकेटर्संनीही ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.
बीसीसीआयच्या गोटातूनही प्रतिक्रिया
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी विराट कोहलीच्या निर्णयाचा आम्हाला आदर असल्याचे म्हटले आहे. संघाचे नेतृत्व करत असताना विराट कोहलीने बॅटिंगमध्येही उल्लेखनिय काम केली. त्याने कॅप्टन्सीच्या माध्यमातून दिलेले योगदान अनमोल असल्याचे धुमल यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण याचा निर्णय निवड समिती घेईल, असेही स्पष्ट केले.
कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीने संघाला सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. यापुढे एक खेळाडू म्हणून तो संघासाठी महत्वपूर्ण असेल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.