पाहा, तुम्हाला पटतंय का सुनील गावसकर यांचं मत?
IND vs NZ, 3rd T20 : भारताने न्यूझीलंडच्या संघाला ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-०ने मागे टाकले आहे. आज या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या टी२० सामन्यात भारताने त्यांना ५-० असे पराभूत केले होते. आजचा सामना जिंकत सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडला टी२० क्रिकेटमझ्ये व्हाईटवॉश देण्याची संधी भारताला आहे. आजचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने काय करावं याचं उत्तर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिलं.
"लोकेश राहुल सध्या जोरदार लयीत फलंदाजी करत आहे. जेव्हा एखादा फलंदाज अशा लयीत असतो तेव्हा तो विश्रांती घेण्याच्या विरोधात असतो. तो स्वत:ला संघाबाहेर ठेवण्याबद्दल कधीच सुचवत नाही. भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर सारखे आताच संधी मिळालेले खेळाडूदेखील संघाबाहेर होण्याच्या विचाराविरोधात असतील यात दुमत नाही. पण असं असलं तरी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी यांना विश्रांती देण्यात यायला हवी", असं मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं.
"सध्या भारतीय संघाला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योग्य वेळ आहे. कोहली, बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ते दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी पुन्हा संघात येतील. त्यामुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना जर संधी द्यायची असेल तर त्यासाठी आताच चांगली वेळ आहे. भारताने मालिका आधीच जिंकली आहे, त्यामुळे नव्या खेळाडूंवर दडपण खूपच कमी असेल", असा सल्ला गावसकरांनी दिला.
"ईडन गार्डन्सचं मैदान खूप जणांसाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करण्यासाठी चांगलं मानलं जातं. रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात याच मैदानावरून केली होती. त्यामुळे आजच्या संघात नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.