हॅप्पी पेरेंटिंग : सामना अपयशाचा!

आपली मुलं कितीही हुषार असली, तरीही कधीतरी त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो - कधी परीक्षेत गुण कमी पडतात.
Happy Parenting
Happy ParentingSakal

आपली मुलं कितीही हुषार असली, तरीही कधीतरी त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो - कधी परीक्षेत गुण कमी पडतात, कधी एखाद्या खेळात हार पत्करावी लागते किंवा कधी एखाद्या कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळत नाही. अर्थातच अशा वेळेस मुलं रडवेला चेहरा करून घरी येतात, तेव्हा कुठल्याही प्रेमळ आई-वडिलांना वेदना होतात.

नैसर्गिकरित्या आपण लगेचच मुलांचं सांत्वन करून त्यांना त्यावरचं उत्तर काही वेळ सांगू पाहतो, काही वेळा त्यांना नावं ठेवतो. काही वेळा ‘आधी सांगितलं होतं, तेव्हा ऐकलं नाही. आता का रडतो?’ असंही ऐकवतो, तर काही वेळा चक्क दुर्लक्षही करतो. काही वेळा एखादी हळवी आई मुलांबरोबर स्वतःही रडून मोकळी होते. अशा वेळेस नक्की काय करायचं, याची काही तंत्रं आता बघूयात.

कुतूहल दाखवा, प्रतिक्रिया टाळा

मूल ‘अपयश’ घेऊन घरी आलं, की आपण सहज प्रतिक्रिया देतो, ‘‘अरेच्चा, असं कसं झालं? तू अभ्यासच नीट नाही केला. नुसता टाईमपास केलास’’ वगैरे वगैरे. यातून मुलाला काहीच शांतता मिळत नाही. त्यापेक्षा, मुलाच्या शेजारी बसून त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करूयात! कारणं न विचारता त्याला ‘आत्ता काय वाटतंय,’ हे समजून घेऊयात. त्यानं अपयशाचं दुःख आपसूकच कमी व्हायला लागतं.

वाईट वाटणं स्वाभाविक आहे!

मुलं रडत असतील, तर आपण पटकन् बोलून जातो - ‘‘झालं गेलं होऊन गेलं. आता कशाला रडतोस?’’ प्रत्यक्षात तीच वेळ आहे जेव्हा मुलं भावना व्यक्त करायला शिकतात आणि त्यावर योग्य तो उपायही शोधायला लागतात. आपण फक्त शेजारी बसून ‘मी तुझ्याबरोबर आहे!’ एवढंच जाणवून द्यायचं असतं, तेही कमीत कमी बोलून.

नावं ठेवणं टाळा

मुलांचं दुःख कमी करण्यासाठी आपण सहजच दुसऱ्यांना जबाबदार धरतो - ‘‘तुझे शिक्षकच खडूस आहेत. निवडीमध्ये पार्शलिटी झालीय,’’ अशी वाक्यं सहज बाहेर पडतात. पण त्यानं आपल्या मुलांना ‘परिस्थितीच/ जगच आपल्या विरोधात आहे! आपण काहीच करू शकत नाही,’ अशी निराशा येऊ शकते.

प्रत्येक जण कधी ना कधी हरत असतो

थॉमस एडिसनपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज कधी ना कधी पराभूत झाले आहेत. त्यांचं यश हे त्यांच्या अपयशातून शिकून परत प्रयत्न करण्यात आहे.

अपयश हा एक क्षण आहे

प्रसिद्ध लेखक हेन्री न्यूबोल्ट म्हणतो त्याप्रमाणे ‘यश-अपयश हा एक क्षण आहे!’ आपलं जीवन ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपण मुलांचं दुःख कदाचित कमी करू शकणार नाही; पण त्यांना वेळ तर देऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com