आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक महिन्यात शिवपुत्र कार्तिक स्वामींचा जन्म झाला होता. त्यामुळे या पौर्णिमेला धार्मिकदुष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक स्वामींचा जन्माची गाथा काही वेगळीच आहे. तर, त्यांनी महिलांना एक शाप दिला होता. तो आजही पाळला जातो.
शिवलीलांमधला सगळ्यात रम्य भाग म्हणजे कुमार कार्तिकेयाचा जन्म माता सतीने देहत्याग केला. भगवान शंकर आपल्या सृष्टी कर्मातून बाजूला होऊन आत्म समाधीमध्ये लीन झाले. त्यांना पुन्हा सृष्टीकार्यात आणण्यासाठी शक्तीच्या पुन्हा अवतार घेण्याची आवश्यकता पडली.
म्हणून एक अनोखा प्रसंग घडला ब्रह्मदेवांनी तारकासुर नावाच्या दैत्याला एक वरदान दिले. की, तुझा वध शिवपुत्राच्या हातून होईल या वरदानाचा प्रभाव म्हणून तारकासुर उन्मत्त झाला.
कारण भगवान शिव आत्मानंदामध्ये लीन होते. तर त्यांच्या शक्तीचा अवतार झाला नव्हता. मग देवांच्या विनंतीवरून आदिशक्तीने हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्म घेतला. तपाचरण करून कठोर परिक्षेनंतर माता पार्वती भगवान शंकरांची पत्नी झाली खरी, पण दोघेही सदासर्वकाळ एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेले. त्यामुळे शिवपुत्राचा जन्म दृष्टिक्षेपात येईना. म्हणून मग एके दिवशी समस्त देव अग्नीला समोर ठेवून भगवान शंकरांच्या दारात आर्त हाक घालू लागले.
असंही म्हणतात की परमप्रतापी भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र उद्या आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून इंद्र विकल्प भावनेने शंकरांच्या द्वारी उभा राहिला. माता पार्वतीला सोडून भगवान देवाच्या भेटीला आले. त्यांनी स्वतःच सगळं तेज अग्नीच्या ओंजळीत टाकले. शिवाचं तेज धारण करून लज्जित झालेल्या अग्नीने ते तेज गंगेमध्ये प्रवाहित केले.
गंगा मातेने ते तेज स्वतःच्या उदरात वाढवले म्हणून तो गांगेय. नंतर कोणे एकेकाळी सहा कृतिका गंगेत स्नान करण्यास आल्या. गंगेने त्या तेजाचे सहा भाग करून सहा जणींच्या उदरात ठेवले. कालांतराने लोकापवाद नको म्हणून त्यांनी जन्म दिलेल्या सहा पुत्रांना एकत्र करून कुठेतरी ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्या क्षणी तो पुत्र एकाकार होऊन त्यांने 6 मुखे बारा हाताचे रूप घेऊन एकाकार झाला कृतिकांपासून जन्मला म्हणून तो कार्तिकेय अशा कार्तिकेयाला कृत्तिकांना शरकांडामध्ये म्हणजे दर्भाच्या वनात सोडून दिले. आकाशभ्रमण करणाऱ्या पार्वतीने त्याचे रडणे ऐकून त्याला उचलून घेतले.
त्याला पोटाशी धरताच स्वतःचे स्तन्य पाजून तिने त्या पुत्राचे पोषण केले. शरकांडामध्ये सापडला म्हणून त्याला शर्वणभव असे सुद्धा म्हणतात. कार्तिकेय आपलाच पुत्र आहे हे लक्षात आल्यावर पार्वतीने त्याला स्वतःच्या सगळ्या शक्ती दिल्या ती शक्ती मूर्तिमंत रूपाने स्वामीच्या हातातला भाला म्हणून ओळखली जाते.
यथा काळी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला आता मातेला स्वतःच्या पुत्राच्या लग्नाची घाई झाली. सूनमुख पाहायला आतुर पार्वतीने कार्तिकेयाला लग्नाची गळ घातली. पण स्त्री कशी असते या प्रश्नाचे उत्तर मातेने माझ्या सारखी असे म्हणताच समस्त स्त्रिया मला तुझ्या स्वरूपात आहेत.
भगवंतांनी दिला संबंध महिलावर्गाला शाप
म्हणून मी लग्न करणार नाही असा निश्चय भगवान कार्तिकेय यांनी केला. तो निश्चय करताच कार्तिकेयाला कुमारस्वामी असे नाव मिळाले. ही घटना कोल्हापुरातील कपिलतीर्था शेजारी घडली इथे कार्तिकेयाचे कुमार स्वामी नावाचे मंदिर होते. माता अधिकच आग्रह करताच कोणतीही स्त्री माझे दर्शन करेल तर ती विधवा होईल, अशी शापवाणी उच्चारून कार्तिकेय दक्षिणेला मोरावर बसून निघाले.
त्यांच्या मोराच्या घामापासून मयुरी नावाची नदी झाली तोच दुधाळी नाला हा दुधाळी नाला जिथे पंचगंगेला मिळतो तिथे कार्तिकेयाचे मयूर स्वामी नावाचे मंदिर होते. यानंतर कार्तिकेय प्रयागामध्ये जाऊन दार म्हणजे कपाट लावून बसले म्हणून त्यांना कपाट स्वामी असे नाव मिळाले.
आजही प्रयागात कार्तिकेयाचे सहा मुख आणि बारा हात असलेली मूर्ती असणारे मंदिर आहे. इथेही पार्वती येईल हे जाणून कार्तिकेय दक्षिणेला गेले. तिथे माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी वारंवार समजूत घातल्याने विवाहाला तयार होऊन इंद्रकन्या देवसेना आणि वनकन्या वल्ली यांच्याशी विवाह केला.
कार्तिकेयाचे ब्रह्मचर्य हे फक्त महाराष्ट्रातील परंपरांमध्ये उल्लेखित असल्याने महाराष्ट्रात स्त्रिया जिथे एकट्या कार्तिकेयाचे मंदिर असेल तेथे दर्शन करत नाहीत. याउलट शिवपंचायतन म्हणजे गौरी गणपती शंकर आणि नंदी यांच्या बरोबर असलेल्या कार्तिकेयाचे कायम दर्शन घेता येते. कारण इथे कुमार प्रधान देव नाही.
कार्तिकेयाचा जन्म कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना झाला. म्हणून या दिवशी माझे दर्शन घेणारा तो स्त्री असो वा पुरुष सात जन्म धनधान्य विद्या यांनी संपन्न होईल. असा वर दिला म्हणून कार्तिक महिन्यात कृत्तिका नक्षत्र असताना महाराष्ट्रात स्त्रियादेखील कार्तिकेयाचे दर्शन करतात.
काही लोक कृतिका नक्षत्र आणि पौर्णिमा यांची सांगड घालतात वास्तविक श्लोकाप्रमाणे पौर्णिमेचा उल्लेख नसून फक्त कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिना यांचा उल्लेख आहे. त्यामुळे कृतिका नक्षत्र पौर्णिमा सोडून जरी आले तरी कार्तिक महिना असल्याने तो दर्शनाचा योग समजावा.
कुमार स्वामिनी स्त्रियांना शाप देण्यामागे त्याचा स्त्रीद्वेष हे कारण नसून आपला कधी विवाह होऊ नये ही भावना होती त्यामुळे निष्काम भावनेने पार्वतीपुत्र म्हणून स्नेहाने त्याचे दर्शन घेणाऱ्या स्त्रीला कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
(संबंधित कथा इतिहासतज्ज्ञ ऍड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेण्यात आली आहे)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.