Loksabha Election : ही निवडणूक तुमच्या-माझ्या राजकीय भवितव्याची निवडणूक आहे ; जयंत पाटील

इस्लामपूर येथील जाहीर सभेत बोलताना जयंत पाटील. समवेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील,प्रा.नितीन बानूगडे-पाटील,मेहबूब शेख. इस्लामपूर (जिल्हा सांगली) : राज्यात राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

इस्लामपूर : येथील जाहीर सभेत बोलताना जयंत पाटील. समवेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील,प्रा.नितीन बानूगडे-पाटील,मेहबूब शेख. इस्लामपूर (जिल्हा सांगली) : राज्यात राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक तुमच्या-माझ्या राजकीय भवितव्याची निवडणूक आहे. आपण मला ज्याप्रमाणे विधानसभेला मताधिक्य देता,तसे मताधिक्य देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी येथे जाहीर सभेत बोलताना केले.

येथील गांधी चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचाराची सांगता प्रचंड जाहीर सभेने केली. यावेळी उमेदवार,माजी आमदार सत्यजित पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानूगडे- पाटील,युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,प्रसिध्द वक्ते यशवंत गोसावी,युवा नेते प्रतीक पाटील,माजी नगराध्यक्ष अँड. चिमण डांगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील,शकील सय्यद, काँग्रेसचे राजेंद्र शिंदे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, "ही निवडणूक जनतेने हातात घेतलीय. दोन मराठी माणसाचे पक्ष फोडून महाराष्ट्र लुटला जात आहे. महागाई,भ्रष्टाचार,बेकारी व महिलावरील अत्याचाराच्या विरोधात लोकांच्यामध्ये प्रचंड चीड आहे. भाजपच्या ४०० पारमधील हवा कमी झाली आहे. २०० पार करताना दमझाक होत आहे. सत्यजित पाटील हे सरळ,शांत कामाचा अनुभव असणारे,आणि सर्व घटकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत. त्यांना संधी द्यावी." नितीन बानूगडे-पाटील म्हणाले, "आपल्या तालुक्यास क्रांतिकारी विचारांचा वारसा आहे.

आपणास स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई जिंकायची आहे. मोदींच्या गॅरंटीला वॉरंटी आहे का? त्यांनी १५ लाख,२ कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांना हमी भाव,गरीबांना पक्की घरे, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आदी पूर्वी दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? देशात युवकांची संख्या ४६ कोटी आहे,मात्र दुर्दैवाने त्यातील ६५ टक्के युवकांच्या हाताला काम देऊ शकले नाहीत." प्रतीक पाटील म्हणाले, "भाजपकडे महागाई,बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्दयावर उत्तर नाही.

त्यांच्याकडे जाहिरातीस ८ हजार कोटी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला,प्राथमिक शाळा वाचवायला पैसा नाही. तुमच्या एका मताने देशाचे भवितव्य घडणार आहे." मेहबूब शेख, यशवंत गोसावी,शहाजी पाटील, अँड.चिमण डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजयराव पाटील, प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, विश्वनाथ डांगे,अँड.धैर्यशिल पाटील,संदीप पाटील, पुष्पलता खरात उपस्थित होते.

अकलूजची पळापळ आणि अधिकाऱ्यांना वास!

जयंत पाटील म्हणाले, "अकलूजमध्ये एक छोटेसे काम करून आलोय. तेंव्हापासून भाजपाचे बडे- बडे नेते रात्रंदिवस हेलपाटे घालत आहेत. आम्ही छोटेच काम करतो,मात्र करेक्ट करतो. राज्यात आपलेच सरकार येणार आहे. आज काही अधिकाऱ्यांना फोन केले. इतके नम्र बोलत होते. अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सत्तेचा वास चटकन येतो."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com