''मोदी- शहा यांच्या कामाचा गवगवा जगभरात आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे.''
कऱ्हाड : आपलं मत नरेंद्र मोदींना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला द्यायचे आहे, असे ठरवून लोकांत प्रचार करा, उमेदवार कोण ते जाहीर होईलच. मात्र, महायुतीचा प्रचारही महत्त्वाचा आहे. साताऱ्याचा खासदार (Satara Lok Sabha) महायुतीचाच आणि मोदी यांचा हात बळकट करणारा असेल, अशी जिद्द ठेऊन सामान्यांपर्यंत पोचा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले.
विजयनगर येथे महायुतीच्या झालेल्या मेळाव्यात मंत्री देसाई बोलत होते. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा लोकसभेचे प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, चित्रलेखा माने-कदम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव, भरत पाटील आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘मोदी- शहा यांच्या कामाचा गवगवा जगभरात आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. उमेदवार कोण ते जाहीर होईलच, त्याची वाट पाहत बसू नका. खासदार महायुतीचा झालाच पाहिजे, त्यासाठी नेत्यापासून कार्यकर्त्यांनी एकदिलाने झटले पाहिजे.’’
उदयनराजे म्हणाले, ‘‘देशाचा लौकिक वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी व शहा करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी विविध माध्यमातून प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांनी महायुतीला साथ देऊन देशाच्या विकासात सहभागी व्हावे.’’ अतुल भोसले म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांनी देशाचा लौकिक वाढवला आहे. विकासाचा मोठा डोंगर उभा करताना मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन क्रमांकावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. कारखानदारांचा प्रश्न मार्गी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.’’
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘आपला भाग उसाच्या अर्थकारणाभोवती फिरतो. त्याकडे काँग्रेस सरकारने दुर्लक्ष केले होते. त्यावेळी आयकरचा प्रश्न बिकट होता. मोदी सरकारने त्याचे गांभीर्य ओळखून तो प्रश्न सोडवला. विरोधक काय म्हणतात, त्याकडे लक्ष देऊ नका. आपले प्रश्न सोडवणारांना ओळखा. साखर कारखान्यांना आयकरच्या नोटिसा आल्या होत्या. मोदींनी त्याचा निर्णय घेऊन कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावला.’’ यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, धनाजी पाटील यांची भाषणे झाली. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
आमदार नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, माहिती नाही. मात्र, मीही मागणी केली आहे. उदयनराजे, आपण दिल्लीत भेट घेतली. तेथे आपली ओळख आहे. आमची नाही. मात्र, आम्ही मागणी केली, हे निश्चित. दिल्लीत ओळख नसल्याने आम्ही सागर बंगल्यावर गेलो. तेथून आम्ही थेट दिल्लीत पोचलो. तेथे पक्षाकडे मागणी केली अन् परत फिरलो. महाराज आपण मोठे नेते आहात. आपण आमच्याकडे लक्ष द्यावे. मागील निवडणुकीत आमच्या बंधूसह कामगार संघटना तुमच्या बाजूने होते. तरीही आम्ही लढा दिला. उमेदवारीचा निर्णय काहीही होऊ दे. युतीच्या उमेदवार निवडून द्यायचा निर्धार करा.’’