Kolhapur Lok Sabha : 'नथुराम गोडसेच्या विचाराने चाललेल्या भाजप सरकारला उलटवून टाका'; शाहू महाराजांच्या प्रचारार्थ मेळावा
'अदानी आणि अंबानी अशा बड्या धेंड्यांचाच विकास करण्याची मानसिकता असलेल्या या भाजप सरकारने पायाभूत सुविधाच विक्रीस काढल्या आहेत.'
उत्तूर : जनतेवर महागाई लादणाऱ्या, लाचारपण आणि लाळघोटेपणाची शिकवण देणाऱ्या, हुकुमशाही पद्धतीने कारभार हाकणाऱ्या आणि गोरगरिबांची फसवणूक करून राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या नव्हे तर नथुराम गोडसे (Nathuram Godse) याच्या विचारांने चाललेल्या भाजप सरकारला उलटवून टाका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या प्रचारार्थ उत्तूर (ता. आजरा) येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यापूर्वी काढण्यात आलेल्या शाहू महाराज यांच्या मिरवणुकीला प्रतिसाद मिळाला. वाटेत महिलांकडून ठिकठिकाणी महाराजांचे औक्षण करून स्वागत केले.
आपटे म्हणाले, ‘ही निवडणूक हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आपल्या सर्वांना लढायची आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा, कोणत्याही क्षणी हाकेला धावून येणारा, खुल्या मनाने मदतीचे दान पदरात टाकणारा हा राजा यापूर्वी जिल्ह्याने अनुभवला आहे. आता आपल्या प्रत्येक समस्या, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या राजाला थेट दिल्लीला पाठवण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी शाहू महाराज यांना निवडून द्यायचे आहे.’
कॉ. संपत देसाई म्हणाले, ‘भांडवलशाहीविरूद्ध सर्वसामान्य जनता असे या निवडणुकीला स्वरूप आले आहे. अदानी आणि अंबानी अशा बड्या धेंड्यांचाच विकास करण्याची मानसिकता असलेल्या या भाजप सरकारने पायाभूत सुविधाच विक्रीस काढल्या आहेत. जाती आणि धर्मात भांडणं लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे.’
शाहू महाराज म्हणाले, ‘मातीत सोने पिकवण्याची जिद्द बाळगणारा शेतकरी आजरा तालुक्यात पहावयास मिळतो. पण, त्याच्या कष्टाचे चीज होत नाही. भरभरून निसर्गसंपन्नता लाभलेल्या या तालुक्याच्या विकासाचा ध्यास ठेवून यापुढे काम करण्याचा निर्धार आपण केला आहे. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी, पर्यटन वाढीसाठी, काजूला हमीभाव मिळण्यासाठी आपण निश्चितपणे संसदेत आवाज उठवू.’
यावेळी मुकुंदराव देसाई यांचेही भाषण झाले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, प्रा. किसनराव कुराडे, कॉ. संजय तरडेकर, आजऱ्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संजय सावंत, उत्तूरचे सरपंच किरण आमणगी, माजी सरपंच वैशाली आपटे, महेश करंबळी आदी उपस्थित होते.