Udayanraje Bhosale Satara Lok Sabha Election
Udayanraje Bhosale Satara Lok Sabha Electionesakal

Satara Lok Sabha : 'प्रत्येक निवडणूक ही खऱ्या अर्थाने कसोटीच असते'; विजयानंतर असं का म्हणाले उदयनराजे?

आपल्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत असतात.
Summary

लोकशाहीत नेता हा विश्वस्त, मार्गदर्शक आणि प्रतिनिधी असतो; परंतु जनता जनार्दनच खरा राजा असतो.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha Election) मिळालेल्या विजयानंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मतदारांसह निवडणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात उदयनराजे यांनी एक पत्र लिहिले असून, लोकशाहीत जनता जनार्दनच राजा असल्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला आहे.

उदयनराजेंनी म्हटले आहे, की प्रत्येक निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची कसोटी असते. आपल्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत असतात. जय किंवा पराजय हाच कोणत्याही परीक्षेचा, युद्धाचा आणि निवडणुकीचा अंतिम परिणाम असतो; परंतु त्याची पर्वा न करता नेत्याची आणि पक्षाची सावलीसारखी पाठराखण करणारे जिवाभावाचे कार्यकर्ते हीच नेत्याची खरी ताकद असते.

Udayanraje Bhosale Satara Lok Sabha Election
'लोकसभेच्या पराभवाने मी संपणार नाही, कोणाला वाटत असेल शिंदे संपले, पण..'; शशिकांत शिंदेंचा कोणावर रोख?

सुदैवाने मला असे हजारो सवंगडी पहिल्यापासून लाभले. त्यांच्या सोबतीने जीवनातील प्रत्येक चढउतार सुकर केला. या मंडळींनी सर्व उन्हाळे-पावसाळे माझ्यासोबत पाहिले. कधी गुलाल उधळला, तर कधी अश्रू पुसले. यातील एकाही क्षणाचे विस्मरण मला आजन्म होणार नाही. उदयनराजे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वास दाखविला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच माझे हात बळकट केले.” 

Udayanraje Bhosale Satara Lok Sabha Election
'ज्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना कधीच क्षमा करणार नाही'; माढ्यातील पराभवानंतर रणजितसिंहांचा कोणाला इशारा?

लोकशाहीत नेता हा विश्वस्त, मार्गदर्शक आणि प्रतिनिधी असतो; परंतु जनता जनार्दनच खरा राजा असतो. छत्रपती शिवरायांची शिकवण, न्यायप्रियता आणि सर्वधर्मसमभावाचा वारसा घेऊन मी समाजकारणात पाऊल ठेवल्यापासून जनता जनार्दनाने माझ्यावर उदंड प्रेम केले. या प्रेमाची उतराई सोडाच; वर्णनसुद्धा शब्दांनी होणे शक्य नाही; पण यशाच्या या घडीला त्या अलोट प्रेमाची आठवण करणे आवश्यक आहे. या यशाने मला केवळ आनंदच नव्हे, तर त्यासोबत जबाबदारीची जाणीवही पुन्हा एकदा करून दिली आहे. ती जाणीव माझ्या मनात सदैव राहील याची खात्री बाळगा. प्रत्येक पाऊल उचलताना, प्रत्येक निर्णय घेताना, प्रत्येक वेळी भूमिका घेताना हे प्रेमच मला शक्ती देईल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com