हिंगोली - 'माझ्यावर तोडपाणी करण्याचे आरोप करणाऱ्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी; मात्र, त्यांच्या चिक्की व मोबाईल गैरव्यवहाराची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त करावी, मगच खरा प्रकार उघडकीस येईल,'' असा पलटवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला.
आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी झालेल्या सभेत मुंडे बोलत होत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हिंगोलीत केलेल्या टीकेला त्यांनी या वेळी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असताना आमच्या बहिणीने हिंगोलीत आमच्यावर टीका केली. त्यावरून त्यांनी बीडमधील पराभवाची धास्ती घेतली असावी.''
भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली. निवडणुकीपूर्वी दिलेले "अच्छे दिन'चे स्वप्न पूर्ण झाले नाही. नोटाबंदी, जीएसटी, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आदींतून जनतेला काय फायदा झाला, हे का सांगत नाही? मोदी सरकारच्या फसवणुकीची पाच वर्ष पूर्ण झाली असून, हे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हुकूमशाही निर्माण होईल.' खासदार हुसेन दलवाई, आमदार रामराव वडकुते, आमदार डॉ. संतोष टारफे आदी उपस्थित होते.
|