पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले.
खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच न मिळाल्याने भारावून गेलो, असा अनुभव सांगत शिवाजी देशमुख या आजोबांचे डोळे पाणावले.
औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. ७७ वर्षीय जयश्री देशमुख या औंध परिसरातील रहिवासी. चालता येत नसल्याने वॉकर घेऊन त्या मतदान केंद्रावर आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘एक पाय दुखत असल्याने चालता येत नाही. परंतु, केंद्रावर आल्यानंतर व्हीलचेअर आणून देण्यासंदर्भात विचारणा केली. एका कर्मचाऱ्याने हाताला धरून बूथच्या दारापर्यंत नेऊन सोडले. मतदान झाल्यानंतर पुन्हा बाहेर गाडीपर्यंत येण्यास मदत केली.’’
यंदा मतदानासाठी मध्यमवर्ग आणि तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत, असे समाधान ८६ वर्षांच्या वसंत कुलगोड यांनी व्यक्त केले. वयाची बहात्तरी पार केलेले केशव माळी म्हणतात, ‘‘मी आतापर्यंत खूप वेळा मतदान केले. परंतु, मतदानासाठीचा एवढा उत्साह कधीही पाहिला नाही. मतदान केंद्रावरील बूथची संख्या वाढविली असती, तर रांगा लागल्या नसत्या.’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.