मोठी बातमी ! 14 जिल्हा बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडताच; कोणत्या बॅंकेला किती उद्दिष्टे जाणून घ्या...

croploan
croploan

सोलापूर : कोरोनामुळे शेतमाल बांधावर फेकून देणाऱ्या बळीराजाला बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे. कर्जमाफीस पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे आणि ती रक्‍कम सरकारकडे येणेबाकी म्हणून दाखवावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. तरीही राज्यातील 14 जिल्हा बॅंकांनी हात आखडता घेतला असून त्यांनी उद्दिष्टाच्या 40 टक्‍केदेखील कर्जवाटप केले नसल्याचे समोर आले आहे.


राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने पुणे विभागातील चार जिल्हा बॅंकांना चार हजार 186 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. तर कोल्हापूर विभागातील चार जिल्हा बॅंकांना एक हजार 678 कोटींचे, नांदेड विभागातील तीन बॅंकांना एक हजार 241 कोटींचे, नाशिक विभागातील पाच जिल्हा बॅंकांना दोन हजार 43 कोटींचे, औरंगाबाद विभागातील पाच जिल्हा बॅंकांना 927 कोटींचे आणि नागपूर विभागातील आठ जिल्हा बॅंकांना तीन हजार 230 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. त्यापैकी 15 जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप उद्दिष्टानुसार सुरु आहे. त्यामध्ये कोल्हापूर अव्वल असून पुणे जिल्हा बॅंक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, लातूर, परभणी, उस्मानाबाद, धुळे, सातारा, सोलापूर या जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप उद्दिष्टाच्या 45 ते 55 टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे.

राज्यातील 14 जिल्हा बॅंकांचे वाटप 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी
लॉकडाउनमुळे हतबल झालेल्या बळीराजाला बॅंकांनी उद्दिष्टानुसार कर्जवाटप करावे, कोरोनामुळे कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना कर्ज देऊन त्यांची रक्‍कम सरकारकडे येणेबाकी दाखवावी, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. मात्र, राज्यातील नगर, जळगाव, नाशिक, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, औरंगाबाद, जालना, बीड, अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर या 14 जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर काही बॅंकांनी तर उद्दिष्टाच्या 15 टक्‍केदेखील कर्जवाटप केले नसल्याचे समोर आले आहे.
 

जिल्हा बॅंकनिहाय कर्जवाटपाचे उद्दिष्टे

  • नगर : 1,498 कोटी
  • पुणे : 1,433 कोटी
  • सातारा : 1,100 कोटी
  • जळगाव : 1,094 कोटी
  • अकोला : 1,060 कोटी
  • सोलापूर : 155 कोटी
  • कोल्हापूर : 686 कोटी
  • सांगली : 832 कोटी
  • रत्नागिरी : 55 कोटी
  • सिंधुदूर्ग : 105 कोटी
  • नांदेड : 186 कोटी
  • लातूर : 740 कोटी
  • परभणी : 315 कोटी
  • धुळे : 221 कोटी
  • नाशिक : 437 कोटी
  • रायगड : 110 कोटी
  • ठाणे : 181 कोटी
  • औरंगाबाद : 411 कोटी
  • जालना : 91 कोटी
  • बीड : 100 कोटी
  • उस्मानाबाद : 259 कोटी
  • बुलढाणा : 66 कोटी
  • अमरावती : 528 कोटी
  • भंडारा : 260 कोटी
  • चंद्रपूर : 545 कोटी
  • गडचिरोली : 61 कोटी
  • गोंदिया : 137 कोटी
  • नागपूर : 91 कोटी
  • यवतमाळ : 548 कोटी
  •  

एकाही बॅंकेने राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केलेली नाही
राज्य स्तरीय बॅंकर्स कमिटीच्या उद्दिष्टानुसार राज्यातील 29 जिल्हा बॅंकांना 13 हजार 305 कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्टे दिले आहे. राज्य सहकारी बॅंकेतर्फेही जिल्हा बॅंकांना कर्जवाटपासाठी अर्थसहाय केले जाते. मात्र, यंदा कर्जमाफीचे बरेच पैसे जिल्हा बॅंकांना आल्याने एकाही बॅंकेने राज्य बॅंकेकडे कर्जाची मागणी केलेली नाही.
- डॉ. ए. आर. देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com