१७६ नवविवाहिता म्हणाल्या, हे सासर नकोच! सासरच्या त्रासाला कंटाळून ९५३ विवाहितांची पोलिस ठाण्यात धाव

विवाहापूर्वी तु माझा प्राण, श्वास अशा आणाभाका देणारा पती सासरच्यांना म्हणतो, ‘हुंडा नको फक्त पोरगी द्या मला’. परंतु, विवाहानंतर भरपूर हुंडा दिला नाही, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, वंशाला दिवा दिला नाही, जाड, काळी आहेस म्हणून पती पत्नीला माहेरी हाकलत आहे.
Dowry Case Domestic Viloence
Dowry Case Domestic Viloenceesakal

सोलापूर : विवाहापूर्वी तु माझा प्राण, श्वास अशा आणाभाका देणारा पती सासरच्यांना म्हणतो, ‘हुंडा नको फक्त पोरगी द्या मला’. परंतु, विवाहानंतर भरपूर हुंडा दिला नाही, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, स्वयंपाक येत नाही, वंशाला दिवा दिला नाही, जाड, काळी आहेस म्हणून तोच पती पत्नीला माहेरी हाकलून देत आहे. अन्याय सहन करणारी ‘ती’ आता शिक्षित झाली आहे. मागील सात महिन्यात जिल्ह्यातील ९५३ विवाहितांनी सासरच्यांविरूद्ध थेट पोलिसांत धाव घेतली असून त्यातील १७६ मुलींनी सासरच्यांना न्यायालयात खेचले आहे.

मुलाला मुलगी आवडल्यानंतर होणाऱ्या वधूला मुलगी समजून तिच्याशी गोडगोड बोलणाऱ्या अनेक सासू विवाहानंतर ‘ती’ला मोलकरीण म्हणून वागणूक देऊ लागल्या आहेत. सासरी गेलेल्या सूनेला आणायला गेल्यावर सासरच्यांनी जावयाला अंगठी, महागडे कपडे घेतले नाहीत म्हणून देखील सासू भांडण काढत आहे.

सासू स्वत: मुलगी असूनही आपल्या सूनेला मुलगी झाल्यावर तिचा छळ करीत आहे. पैशापेक्षा माणुसकी, मानवता सर्वश्रेष्ठ असल्याचे धडे सासूने शाळा-महाविद्यालयातून घेतले, तरीदेखील सूनेच्या सासरच्यांनी विवाहात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही म्हणून मुलाच्या संसारात विष कालवू लागल्याचीही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे अनेक सूनांना पती-पत्नीच्या संसारात सासू-सासरे नको आहेत. त्यातूनही वादविवाद वाढत असल्याचे चित्र आहे. मुलीच्या संसारात माहेरच्यांची लुडबुड हे कारण देखील कौटुंबिक वादासाठी कारणीभूत असल्याची उदाहरणे आहेत. तरीपण, कायद्याने हुंडा बंदी असतानाही हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ होण्याचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

‘भरोसा’मुळे ३९५ संसार पुन्हा जुळले

पती-पत्नीच्या संसारातील संशय, मतभेद दूर करून त्यांचा संसार पुन्हा सुखाने चालावा म्हणून शहर व ग्रामीण पोलिस दलाचा ‘भरोसा’ सेल काम करीत आहे. शहरातील भरोसा सेलने १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ या सात महिन्यात २९३ तर ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा’ सेलने ९१ पती-पत्नींमधील वितुष्ट (वाद) संपुष्टात आणले आहेत.

मोबाईलमुळे संसारात वाढला संशय

मोबाईल हे आधुनिक तंत्रज्ञानाचे माध्यम असून त्यामुळे जग खूपच जवळ आले. त्याचे जेवढे फायदे, तेवढेच तोटे देखील आहेत. अनेक चिमुकली एकलकोंडी झाली असून त्यांना मित्र म्हणून मोबाईलच जवळचा वाटतोय. अनेकांना डोळ्याचे त्रास उद्‌भवले तर काही तरूण-तरूणी नैराश्यात गेले. तसेच विवाहानंतर मुलीच्या विवाहात मोबाईलमुळे संशय देखील वाढल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यातूनच अनेकांचा संसार तुटला असून अनेकांचा संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे.

कौटुंबिक छळाची सात महिन्यातील स्थिती

शहर पोलिस ग्रामीण पोलिस

  • एकूण तक्रारी एकूण तक्रारी

  • ७०४ २४९

  • आपापसात मिटलेल्या तक्रारी आपापसात मिटलेल्या तक्रारी

  • २९३ ९१

  • न्यायालयात दाखल खटले न्यायालयात दाखल खटले

  • १५० २६

  • प्रलंबित तक्रारी प्रलंबित तक्रारी

  • १२४ १०७

  • पोलिसांत दाखल गुन्हे पोलिसांत दाखल गुन्हे

  • १३७ २५

भरोसा सेलकडून कौटुंबिक तक्रारींवर समझोता

महिला किंवा कोणीही अडचणीत असेल आणि त्यांना पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कौटुंबिक छळाच्या तक्रारींवर ‘भरोसा’ सेलकडून यशस्वीपणे तोडगा काढला जातो. त्यासाठी महिलेने ज्यांच्याविरूद्ध तक्रार केलीय, त्यांना नोटीस पाठविली जाते. दोनवेळा नोटीस देऊनही समोरील व्यक्ती हजर न झाल्यास त्यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होतो.

- स्वाती येळ्ळे, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com