
Refinery Project: वेदांता-फॉक्सकॉननंतर कोकणवासियांना बसणार मोठा झटका?
वेदांता-फॉक्सकॉननंतर कोकणातील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पही आता राज्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.(After Vedanta Foxconn now Dhopeshwar refinery project will also go outside Maharashtra)
आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षांपासून रिफायनरी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र रिफायनरी प्रकल्प उभारण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कंपनीने प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हा प्रकल्प 2018 पासून रखडला आहे. प्रकल्पाला अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने कंपनी प्रशासन हा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. इतकेच नव्हे तर प्रकल्पावर होणाऱ्या खर्चात देखील वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. हा प्रकल्प राज्यात झाल्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन मागील अनेक वर्षांपासून राजकारण सुरु आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच इतर ठिकाणी उभारण्याबाबत हालचाली सुरु आहेत. त्यासाठी बारसू गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठीही ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.