सतीश वैजापूरकर, शिर्डी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक कै.मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातल्या मोतीबागेत गेले अन नेटक-यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. मात्र त्यांच्या आजोळचे फार पूर्वीपासूनच संघाशी घनिष्ठ संबंध आहेत, हे माहिती आहे का?
मात्र नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे दादांचे अजोळच आहे. या आजोळचे अन मोतिबागेचे वर्षानुवर्षाचे स्नेहसंबंध आहेत.
संघ विचारावरील श्रध्देपोटी अजित पवारांचे मामा कै.अण्णासाहेब कदम यांनी एकेकाळी कै.यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाला नम्रपणे नकार दिला.
त्यावेळी सत्तेत असलेल्या काॅग्रेस मध्ये जाण्याऐवजी संघ परिवारात कार्यरत रहाणे पसंत केले. मोतीबागेचा आणि दादांच्या आजोळच्या या स्नेहसंबंधाचा इतिहास फार थोड्या लोकांना ठाऊक आहे.
दादा राजकारणात नावारूपाला येईपर्यत आपल्या आजोळी यायचे अन मंत्री झाल्यानंतर देखील ते देवळाली प्रवराला भेटी देत आले आहेत.
ज्या कदम कुटूंबांच्या वाड्यात त्याचे आजोळ त्यातील दोन खोल्या एकेकाळी संघ प्रचारकांच्या वास्तव्यासाठी राखीव असायच्या.
नगरचे अॅड.माणिकराव पाटील, कै.दामुअण्णा दाते,शिवशाहिर कै.बाबासाहेब पुरंदरे, कै.प्रल्हादजी अभ्यंकर आणि पुणतांब्याचे कै.वसंतराव वहाडणे, राहात्याचे कै.चंपालालजी सांड हे कै.कदम यांचे जवळचे सोबती होते.
राहूरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, अजित कदम, जगदिश कदम हि भावंडे पुण्यात शिकायला होती त्यावेळी त्यांच्या राबता अर्थातच मोतिबागेत असे.
दिवगत कदम यांना तिन भाऊ आणि सातशे एकर जमिन. ते नगर जिल्ह्यातले त्यावेळचे सर्वात मोठे जमिनदार आणि कार्य मात्र संघाचे करायचे.
त्याकाळी नगर जिल्ह्यावर कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते. कै.चव्हाण यांनी या पक्षातील मातब्बरांना काॅग्रेस पक्षात आणून बेरजेचे राजकारण केली.
याचकाळात कै.कदम यांचे समाजातील स्थान आणि प्रतिष्ठा लक्षात घेऊन कै. चव्हाण व निफाडचे कै.काकासाहेब वाघ यांनी त्यांना काॅग्रेस मध्ये येण्याचा आग्रह केला.
संघात राहून काही साध्य होणार नाही असा युक्तीवाद देखील केला. तथापी त्यांनी संघात रहाणेच पसंत केले.
दादांच्या आई ताराबाई उर्फ आशाताई या संघ विचारां सोबत एकनिष्ठ असलेल्या कदम कुटुंबात वाढल्या. दादांना संघ विचार कीती ठाऊक आहे हे ठाऊक नाही.
त्यांचे आजोळ मात्र संघविचारावर ठाम आहे.
संघरंगात रंगलेले आजोळ
राहूरीचे (देवळाली प्रवरा) माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे बंधू जगदिश कदम हे शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचे निस्सिम भक्त.
जाणता राजा महानाट्य आणि शिवसृष्टी या दोन्ही प्रकल्पात त्यांची भुमिका नेहमीच केंद्रस्थानी राहीली.
आजही शिवसृष्टीच्या पुढील उभारणीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
कै.यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणास कै.अण्णासाहेब कदम यांनी दिलेला नकार हे दादांच्या अजोळचे वैशिष्ट राहीले आहे.
----------