
‘फोन-पे’वर मागितली ‘API’ने लाच! १०० कोटीच्या वसुलीचा पोलिसांवरील पुसेना ठपका
सोलापूर : शंभर कोटी वसुलीच्या आरोपानंतर पोलिस खात्याची मोठी बदनामी झाली आहे. मलिन झालेली प्रतिमा पुन्हा सुधारावी म्हणून प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. पण, काही मोजक्या लाचखोरांमुळे पुन्हा एकदा पोलिस खाते नागरिकांच्या नजरेत बदनाम झाले आहे. शहरात तीन दिवसांत दोन पोलिस अधिकारी लाच प्रकरणात जेरबंद झाले आहेत.
राज्यातील महसूल व पोलिस हे दोनच विभाग लाचखोरीत अव्वल आहेत. जानेवारी ते २६ जून २०२२ या सहा महिन्यांत पोलिस खात्यातील १०९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याचे व मागितल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला तीन महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यातच लाच घेताना रंगेहाथ पकडला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. २४) त्याच पोलिस ठाण्याशी संलग्नित रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून मासिक हप्ता घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच पासपोर्ट अर्ज पडताळणीसाठी फोन पेवरून दीड हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) अटक केली. १० जून रोजी शिंदे याने त्याचा हस्तक सलाउद्दीन लायकअली मुल्ला याच्या फोनवर पैसे पाठवायला सांगितले होते. त्याची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी पोलिसांची प्रतिमा उंचवावी, लाच कोणीही घेऊ नये म्हणून एक पत्रकच काढले होते. आता विद्यमान पोलिस आयुक्त राजेंद्र माने हे दररोज सर्वांना आवाहन करतात, तरीपण काहीजण लाच घेतातच, अशी स्थिती आहे. पोलिस खात्याच्या बदनामीला कारणीभूत तशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता थेट निलंबित केले जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
पोलिस खात्याची बदनामी होऊ नये, लोकांना पोलिसांचा आधार वाटावा असे काम सर्वांनीच करणे अपेक्षित आहे. दररोज हजेरीच्या वेळी सर्वांनाच तसे आवाहन केले जाते. दुसरीकडे, नागरिकांनीही आपल्या कामासाठी कोणी पैसे मागत असल्यास थेट आम्हाला भेटावे.
- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
नागरिकांनी १०६४ वर करावी थेट तक्रार
नागरिकांच्या तक्रारीवरून आम्ही कारवाई करतो. पोलिस आणि महसूल विभागाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांची कामे करण्यास कोणी पैसे मागत असेल, तर त्याची थेट तक्रार १०६४ या क्रमांकावर करावी. संबंधितावर निश्चितपणे कारवाई होईल. तक्रारदाराचे नाव उघड केले जात नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांनी यावेळी सांगितले.
ऑडिओ रेकॉर्डिंगवरही नाही जनतेला भरवसा
पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून, त्यामध्ये चित्रीकरणासोबतच आवाजही रेकॉर्ड होणार आहे. त्यामागे लाचखोरी, पोलिसांची बदनामी, पोलिसांवरील आरोप थांबतील, असा हेतू आहे. पण, या उपायानंतरही पोलिस लाच घेतीलच. पोलिस ठाण्याजवळील हॉटेल, चहा कँटीन किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून दूर जाऊन लाचेचे प्रकार सुरू राहतील, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यावर आता वरिष्ठ पोलिस अधिकारी काय ठोस उपाय करतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Web Title: Api Solicits Bribes From Phone Pay Police Blamed For Recovering Rs 100
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..