अर्ज करा, आठ दिवसांत मिळेल शेततळे! ७५ हजार रूपयांचे अनुदान; पाण्याअभावी उसाकडे शेतकऱ्यांची पाठ; केळी व द्राक्ष लागवडीस २.५९ लाखांचे अनुदान

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन जरूरी आहे. त्यासाठी कृषी विभागाने वैयक्तिक शेततळे देण्याची प्रक्रिया जलद केली असून अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला आठ दिवसांत मंजुरी दिली जात आहे.
Shettale, maharashtra news
Shettale, maharashtra newssakal

सोलापूर : यावर्षी पाऊस कमी झाला असून जमिनीची पाणीपातळी देखील तब्बल एक मीटरने खाली गेली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन जरूरी आहे. त्यासाठी कृषी विभागाने वैयक्तिक शेततळे देण्याची प्रक्रिया जलद केली असून अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला आठ दिवसांत मंजुरी दिली जात आहे.

मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे दिली जात आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’अंतर्गत शेतकऱ्यांना ‘महाडिबीटी’ पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. ३० फूट रूंद व ३० फूट खोल शेततळ्यासाठी शासनाकडून एकूण दीड लाख रूपयांचे अनुदान दिले जात आहे. खोलीकरणासाठी (खोदाई) ७५ हजार रुपये व अस्तरीकरणासाठी ७५ हजार रूपयांचे अनुदान मिळते. यासाठी देखील लॉटरी पद्धत आहे, पण अर्जदार शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने अर्ज केल्यावर आठ दिवसांतच मंजुरी मिळत आहे. मशीनद्वारे खोदाई करण्यास परवानगी असल्याने एक-दोन दिवसांत काम पूर्ण होते. अनुदानही काही दिवसांत शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा होते. दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना शेततळ्यांचा मोठा आधार मिळू शकतो, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पाण्याअभावी ऊस मोडण्याचे प्रमाण वाढले

यंदा सरासरीच्या तुलनेत अनेक तालुक्यांमध्ये ६० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही. माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला व बार्शी या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. जमिनीची पाणीपातळी देखील एक मीटरने खाली गेली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लागवड केलेला खोडवा, निडवा ऊस मोडायला सुरवात केली आहे. अशा शेतकऱ्यांना तुती, केळी व द्राक्ष लागवडीचा पर्याय असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केळी व द्राक्ष लागवडीसाठी अडीच लाखांचे अनुदान

रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना केळी लागवड, द्राक्ष लागवडीसाठी हेक्टरी अनुदान दिले जाते. कृषी विभागाकडील फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान आहे. तर द्राक्ष लागवडीसाठी हेक्टरी दोन लाख ५९ हजारांचे अनुदान मिळते. पण, त्यासाठी पाच एकर जमिनीची अट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com