
तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून राणांनी सरकारचे आभार मानावेत - बच्चू कडू
'मातोश्री'वर हनुमान चालिसेचा हट्ट धरलेल्या राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली. कारागृहात आपल्यावर अन्याय झाला, छळ झाला, प्यायला पाणीही दिलं नाही, असे आरोप राणा दाम्पत्याने केले आहेत. त्यावरूनच आता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला सुनावलं आहे. तुरुंगात मारहाण झाली नाही म्हणून सरकारचे आभार मानावेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?
राणा दाम्पत्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. मातोश्री हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार? दुसऱ्याच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही, याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवे. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपा कार्यालयातून घेतली जाते.
हेही वाचा: राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलणं भोवण्याची शक्यता
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याने मोठा गोंधळ माजला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना जवळपास १२ -१३ दिवस कारागृहात काढावे लागले. यादरम्यान आपल्याला पाणीही दिलं नाही, झोपायला नीट सोय नव्हती, खाण्यापिण्याचे हाल झाले, महिलेला चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं, असा आरोप राणा दाम्पत्याने केला होता.
Web Title: Bachchu Kadu On Navneet Rana Arrest And Their Custody Maharashtra Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..