

sakal
तात्या लांडगे
सोलापूर : शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच्या सुटाव्यात, त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, कार्यशाळा, बैठकांच्या माध्यमातून गावातील शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात तब्बल ११ हजार ५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार असून त्यात सोलापूर जिल्ह्यात ५३६ मित्र आहेत. दररोज दोन तास त्यांनी काम करायचे असून त्यासाठी त्यांना दरमहा १५०० रुपयांचे मानधन मिळणार आहे.
शेतकरी मित्राने गावात शेतकरी सुविधा केंद्र सुरू करावे, ‘आत्मा’ योजनेअंतर्गत गावात महिला किंवा पुरूष शेतीगट, पीकनिहाय शेतकरी गट, महिला अन्न सुरक्षा गट तयार करून त्यांची क्षमता बांधणीसाठी मदत करण्याचे काम शेतकरी मित्रांवरच असणार आहे. तसेच शेतीशाळेसाठी शेतकरी निवड करणे, कार्यशाळेसाठी मदत आणि त्याठिकाणी उपस्थित रहाणे, ग्रामसभेत गावकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच आहे. शेतकऱ्यांना ‘आत्मा’कडून दिलेल्या प्रशिक्षणाच्या नोंदी ठेवणे, गावातील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन, नियोजन व शेतकऱ्यांना त्याची माहिती देणे, अशी कामेही शेतकरी मित्रालाच करावी लागतील.
दरम्यान, तालुक्यातील एकूण शेतकरी मित्रांपैकी ३० टक्के पदे महिलांसाठी लॉटरी पद्धतीने राखीव असतील. इच्छुक शेतकरी मित्रांनी त्यांचे अर्ज सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समिती केंद्राकडे द्यावेत, जास्त शिक्षण झालेल्यांना प्राधान्य राहणार आहे. प्रत्येकी तीन महिन्यांनी शेतकरी मित्रांची बैठक होईल, एक वर्षानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे. गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.
बंधपत्राचे शेतकरी मित्रांना बंधन
‘मी स्वयंप्रेरणेने व स्वयंस्फूर्तीने काम करण्यास इच्छुक आहे. मला माझ्या मानधनाशिवाय कोणताही अतिरिक्त प्रवास भत्ता, इतर देयके मिळणार नाहीत, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याबाबत माझी कोणतीही हरकत नाही. तसेच, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार बैठकीस अनुपस्थित राहिल्यास किंवा इतर कोणत्या कारणांमुळे माझी सेवा खंडीत झाल्यास, त्यास माझा कोणताही विरोध राहणार नाही. माझी सेवा नियमित करण्याबाबत मी कोणताही दावा करणार नाही.’ असे बंधपत्र प्रत्येक शेतकरी मित्राला द्यावी लागणार आहे.
निवडीचे निकष असे...
उमेदवार अनुभव व प्रयोगशील शेतकरी असावा, उत्तम संवाद कौशल्य असावे आणि २५ ते ६० वयोगटातील हवा.
गावातील रहिवासी, त्याची शेती असावी, गुन्हा दाखल नसावा, उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
सोशल मिडिया हाताळता यायला हवे, दिवसातून दोन तास काम करावे. निवड दोन वर्षांसाठी असेल, त्यास पुन्हा संधी नसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.