

दहावी-बारावी परीक्षा
तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे. सध्या प्रत्येक केंद्राची पडताळणी सुरू आहे. आता ज्या केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ज्या केंद्राला पूर्णपणे वॉल कंपाउंड आहे त्यांनाच परवानगी असणार आहे. यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यवेक्षकांची देखील सरमिसळ करण्यात येणार आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्यांदा २३ जानेवारीपासून त्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा होईल. त्यानंतर १० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत त्यांची लेखी परीक्षा पार पडणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. दरम्यान, मागील परीक्षेत ज्या केंद्रावर कॉपी केसेस आढळले अशा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील २२ केंद्रे आहेत.
आता बोर्डाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रांची पडताळणी झाली आहे. यंदा प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही, बैठक व्यवस्था, वॉल कंपाउंड व अन्य सुविधांचे जिओ टॅगिंग फोटो देखील मागवून घेतले आहेत. परीक्षेत पर्यवेक्षकांचीही यंदा सरमिसळ केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीचे त्यांच्याच शाळेतील शिक्षक परीक्षा केंद्रावर दिसणार नाहीत. बोर्डाने १०० टक्के कॉपीमुक्त परीक्षेसाठी तगडे नियोजन केले आहे.
केंद्रांची पडताळणी सुरु
इयत्ता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रास तथा शाळेला चारही बाजूला पक्के कंपाऊंड आवश्यक आहे. तसेच तेथील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे देखील बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने आता गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक केंद्राची पडताळणी सुरू आहे.
- औदुंबर उकीरडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभाग
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिसूत्री
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे फार कठीण नाही. त्यांच्यासाठी त्रिसूत्री अवलंबण्यात आले आहे. त्यानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन विषयात मिळून विद्यार्थ्यांना १०५ गुण आवश्यक आहेत. तर गणित व विज्ञान या दोन विषयात मिळून ७५ गुण पडायला हवेत. तेवढे गुण घेतलेले विद्यार्थी देखील उत्तीर्ण होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील केंद्रे
इयत्ता दहावीची केंद्रे
१८४
सीसीटीव्ही असलेली केंद्रे
१७८
इयत्ता बारावीची केंद्र
१२१
सीसीटीव्ही असलेली केंद्रे
११९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.