

दहावी-बारावी परीक्षा
तात्या लांडगे
सोलापूर : दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत कॉपी होणारच नाही, असे नियोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे. त्यासाठी लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक अनुदानित शाळांमध्ये आणि तेथील शिक्षक स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये बाह्यपरीक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल. दुसरीकडे, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत पार पडेल. त्यानंतर २० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. दरम्यान, बोर्डाच्या परीक्षेवेळी कॉपी केसेस किंवा गैरप्रकार आढळल्यास आता त्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. केंद्राला पक्के वॉल कंपाउंड, स्वच्छतागृह, पाण्याची सोय, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, अशा बाबींचा त्यात समावेश आहे.
एखाद्या केंद्राचे वॉल कंपाउंड पडलेले असल्यास त्या ठिकाणी लोखंडी जाळी मारायला सांगण्यात आले आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी ७ जानेवारीला बाह्य परीक्षकांचा उद्बोधन वर्ग घेतला जाणार आहे. त्यावेळी बाह्य परीक्षकांनी प्रात्यक्षिकावेळी कोणत्या बाबी तपासायच्या, याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी प्रत्येक जिल्ह्यातील किमान १० टक्के शाळांना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके भेटी देऊन प्रत्यक्षात तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षेची तपासणी करतील, असेही बोर्डाने नियोजन केले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेवेळी बाह्य परीक्षक
इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार आता पूर्णपणे बंद होतील, असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल केली जाणार असून, त्यांनी शाळांमध्ये प्रात्यक्षिकावेळी नेमक्या कोणत्या बाबी तपासायच्या, याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
- औदुंबर उकिरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे
लेखी परीक्षेतही परीक्षकांची सरमिसळ
विद्यार्थ्यांची सरमिसळ करूनही अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केसेस सापडल्या. त्यामुळे आता यंदा प्रथमच पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. तसेच पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे पेपर सुरू झाल्यापासून संपेपर्यंत झूमद्वारे जोडले (कनेक्ट) जाणार आहेत; जेणेकरून परीक्षेतील प्रत्येक हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.