

सोलापूर : ‘सीबीएसई’च्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. २०२६-२७ पासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे, पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला, तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा आणि नववी ते बारावीपर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे. इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत.
दरम्यान, सध्या ‘सीबीएसई’च्या शाळांचे शैक्षणिक वर्ष ३१ मार्चला संपून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १ एप्रिलपासून होते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढविता येणार आहे. ‘सीबीएसई’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय ‘सीबीएसई’प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुरवातीला २०२५-२६पासून दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर २०३०पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार आहे.
ठळक बाबी...
तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झाला असून आता अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तीन महिने लागतील.
अध्यापनाचे तास ४५ मिनिटांऐवजी आता ५० मिनिटांचे असतील, तासिकेचा वेळ दोन सत्रात व एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळे असतील.
परीक्षांमधील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकविण्यावर शिक्षकांचा भर राहील.
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तराविना शाळा भरेल, त्या काळात विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील.
दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदली जाणार असून वर्षात दोनदा परीक्षा होईल, त्यात एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा होईल.
‘सीबीएसई’प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल, गणित व विज्ञान विषय ‘सीबीएसई’प्रमाणेच साम्य राहतील.
शासन आदेशानुसार होईल अंमलबजावणी
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता यापूर्वीच दिलेली आहे. राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १ एप्रिलपासून करायचे नियोजित आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा शासन निर्णय काही दिवासांत निघेल. दुसरीकडे ‘सीबीएसई’प्रमाणेच आपला अभ्यासक्रम राहील किंवा त्याहून उत्तम देखील असेल.
- राहुल रेखावार, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.