भाजपवर आघाड्यांचा परिणाम होणार नाही : देवेंद्र फडणवीस

भाजपविरोधी आघाडीची महाराष्ट्रातून सुरूवात होण्याचा प्रयोग याआधीच्या लोकसभा निवडणुकीतदेखील झाला होता.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसe sakal

औरंगाबाद : ‘‘भाजपविरोधी आघाडीची महाराष्ट्रातून सुरूवात होण्याचा प्रयोग याआधीच्या लोकसभा निवडणुकीतदेखील झाला होता. तेव्हा तर अगदी सगळ्या राजकीय पक्षांचे नेते हातात हात घालून एकत्र आले होते. उत्तर प्रदेशासह देशाच्या अनेक राज्यातही असे प्रयोग झाले, पण त्याचा भाजपवर काही परिणाम झाला नाही आणि यापुढेही होणार नाही,’’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

औरंगाबाद येथे विमानतळावर सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, की तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची त्यांच्याच राज्यात दुरवस्था आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तेलंगणात चार खासदार निवडून आले होते.

आगामी निवडणुकीत भाजप तिथे क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा दावा करीत भाजपविरोधी आघाडीचे अनेक प्रयोग यापूर्वी झाले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे दोन राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांना भेटले, केवळ याच दृष्टीने आम्ही या भेटीकडे पाहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही ‘वॉटर ग्रीड’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. महाविकास आघाडी सध्याच्या राज्य सरकारने आता ‘वॉटरग्रीड’ची हत्या केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली. लासूर स्टेशन येथे विविध विकासकामांचे सुरवात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात सुडाचे राजकारण

‘‘राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. कॅबिनेटमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर कशी कारवाई झाली? किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होत आहे. रवी राणांबाबत काय सुरू आहे?, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय. सरकारची निराशा अशा सुडाच्या राजकारणातून बाहेर येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी सरकारवर केला.

‘महाविकास आघाडी सरकारचा नाशिककरांवर अन्याय’

नाशिक : ‘‘कोरोनाकाळात राज्य सरकारने नाशिकवर अन्याय केला. महापालिकेने स्वनिधीवर कोरोना केंद्र उभारले. केंद्रामध्ये ऑक्सिजन पुरवठा केला नाही. भाजपच्या आमदारांना आंदोलन करावे लागले. त्यानंतरही फक्त आश्‍वासन मिळाले. स्वतःच्या ओळखीचा वापर करून ऑक्सिजनचा पुरवठा केला. मात्र येथे राज्य सरकारने नाशिककरांना वाऱ्यावर सोडले,’’ अशा टीका फडणवीस यांनी केली. राज्यातील सरकार अस्तित्वहीन आहे. मुंबईच्या पलिकडे महाराष्ट्र आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही. भ्रष्ट्राचार, अनाचार वाढला, राज्य होरपळत आहे. या परिस्थितीत महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून जिंकायचे आहे. भाजप विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आलेत. मात्र राजकारणात ‘केमिस्ट्री’ चालते. ती भाजपबरोबर असल्याने निवडणुकांमध्ये ताकदीने एकत्रित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com