
...तर सरकारी कार्यालयात किती काळ वीज बंद राहील? शेलारांचा सरकारवर निशाणा
पुणे : महाराष्ट्रात लोडशेडिंगच्या प्रकरणात सध्या टंचाई आणि टक्केवारी असा प्रकार चालू आहे अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पुण्यात माध्यमांना बोलताना दिली. टंचाई निर्माण सरकारनेच करायची आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमधून खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने वीज विकत घ्यायची आणि त्यातून टक्केवारी आपण घ्यायची असा भ्रष्टाचाराचा प्रकार महाविकास आघाडीकडून करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुरक्षा अनामत रक्कमेचे दर वाढवल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे असं म्हणत सुरक्षा अनामत रक्कम रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. "ज्या भागामध्ये वीज भरणा कमी आहे किंवा रिकव्हरी कमी आहे त्याठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू असं उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, तर मग सरकारच्याच खात्यात हजारो कोटींची थकबाकी असताना सरकारच्या वेगवेगळ्या विभागात किती काळ वीज बंद राहील याची माहिती सरकारने जनतेला द्यावी." असं ते बोलताना म्हणाले. तसंच सरकारने वीज बील भरले नसेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या थकबाक्या का जमा करता असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरुच
तीनही वीजकंपन्यामध्ये बेशिस्तपणे कारभार करण्याचं काम महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे नियोजनशून्यतेचा कारभार जाणूनबुजून केलाय का? असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे कोळश्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती न देण्याची रचना केल्याचा आरोप त्यांनी केला. वीज नियामक मंडळाकडे खासगी कोळसा कंपन्यांसहीत इतरांच्या तक्रारी आल्यानंतर मंडळाने अभ्यासक नेमण्यासाठी सांगितलं होतं पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढावली आहे असा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
राज्यात टंचाई निर्माण करायची, हाहाकार माजवायचा आणि खासगी कंपन्यांकडून वीज घ्यायची अन् त्यातून टक्केवारी घ्यायची असा प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Web Title: Bjp Mla Ashish Shelar On Load Shedding In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..