BMC Election : आम्ही त्यांना अस्मान दाखवू; उद्धव यांचा भाजपवर हल्ला

दसरा मेळाव्यात भूमिका मांडणार
BMC Election Uddhav Thackeray mns shiv sena bjp amit shah eknath shinde devendra fadanavis politics mumbai
BMC Election Uddhav Thackeray mns shiv sena bjp amit shah eknath shinde devendra fadanavis politics mumbaiUddhav Thackerays Latest News

मुंबई : ‘मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जमीन दाखविण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना अस्मान दाखवून देऊ,’ असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांना दिले आहे. ‘शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल,’ असेही त्यांनी नमूद केले. ‘मातोश्री’ या निवासस्थानी आज शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली त्यामध्ये भास्कर जाधव, अरविंद सावंत आदी सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे यांनी नेत्यांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल आणि तेव्हा मला जे बोलायचे ते बोलेनच असे स्पष्ट करत, मागच्या दसरा मेळाव्याचा उल्लेख केला. ठाकरे म्हणाले, ‘‘ आतापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावे लागायचे. यावेळी जे सुचेल, जे बोलायचे ते मी बोलेन.’’

अमित शहा यांनी युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अडीच वर्षांबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. तशा प्रकारचे कोणतेही आश्वासन भाजपकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आले नव्हते पण तरीदेखील शिवसेनेने धोका दिल्याचा आरोप केला होता. यावर भाष्य करताना ठाकरेंनी अमित शहा यांचा नामोल्लेख टाळत आपल्याला मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचे स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदाची हाव असती तर क्षणात पद सोडले नसते. ममता बॅनर्जी यांच्याशीही माझी ओळख होतीच ना. मी सगळ्यांना कोलकत्याला घेऊन गेलो असतो. तिकडे कालिमातेच्या मंदिरात नेले असते. राजस्थानला कुठेतरी नेले असते. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचे असेल तर निष्ठेने राहायचे. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणे याला राहाणे म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितले दरवाजा उघडा आहे. राहायचे त्यांनी निष्ठेने राहावे.’’

भास्कर जाधवांवर विश्वास

उद्धव ठाकरेंनी यापुढे पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच आ. भास्कर जाधव यांना तुमच्याकडून महाराष्ट्राला भरपूर अपेक्षा आहेत, असा विश्वासही बोलून दाखविला.

ठाकरे म्हणाले

  • भाजपला गणपती मंडपात राजकारण दिसते

  • शिवसेनेचा सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे

  • जो संघर्षात आपल्यासोबत तो आपला

  • निष्ठा कधीही विकता येत नाही

  • आज माझ्यासोबत कट्टर शिवसैनिक आहेत

मनसे-शिंदे गटामध्ये जवळीक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना ‘मिशन १५०’चे लक्ष्य दिले असतानाच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जात गणपतीचे दर्शन घेतले. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याबाबत चर्चा सुरू झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, भाजप आणि शिंदे गटच एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी बोलताना याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेणार असल्याचे सांगितले. कोणतीही युती होण्यासाठी विचारधारा जुळणे महत्त्वाचे असून, तशाप्रकारे विचारधारा जुळणार असेल तर युती होऊ शकते, असे मोघम उत्तर देशपांडे यांनी दिले आहे.

शिंदे गट आणि मनसे मुंबईत एकत्र लढणार अशा चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या सर्व प्रसारमाध्यमांमधील चर्चा असल्याचे म्हटले आहे. ‘ही पत्रकारांची पतंगबाजी असून, ज्याच्या जे मनात येईल त्याप्रमाणे इंटरप्रिटेशन केले जाते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजप आणि मूळ शिवसेना म्हणजे शिंदे गट असे आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस यांच्यात खलबते

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये लगेचच रात्री उशिरा ‘वर्षा’वर दोन तास चर्चा झाली. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या ‘मिशन १५०’च्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातील समन्वय साधण्यासंबंधी चर्चा झाली असल्याचे समजते.

महापालिका निवडणूक भाजप - शिंदे गट एकत्र लढणार आहे, भाजपचे मिशन ‘महाराष्ट्र’ आहे. आमचे मिशन केवळ बारामती नाही. आमच्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com