
Sambhajinagar: तरुण पिढी नशेच्या आहारी ! नशा करण्यापासून थांबवलं म्हणून २० वर्षीय लेकानं बापावर उचलला हात
Chhatrapati Sambhajinagar: अनेक तरुण आणि किशोरवयीन मुलांना बटण आणि गांजाचे व्यसन लागले. व्यसनाच्या आहारी गेलेली अशी मुले हिंसक आणि एकलकोंडी होत आहेत. एकूणच काय तर अशा मुलांचे विश्वच नाही तर भावविश्वही बदलत आहे. त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे पालक अटोकाट प्रयत्न करीत आहेत. अशा मुलांना मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
ई-सिगारेटमुळे व्यसन
एका प्रसिद्ध शाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेणारा एक मुलगा गंमत म्हणून सुरुवातीला ई-सिगारेट ओढत होता. शाळेतील मित्रांमुळे त्याने असे केले. पुढे ई-सिगारेटऐवजी सिगारेट आणि नंतर बटणची त्याला सवय लागली. या सवयीमुळे कधी एकदम आनंदी तर कधी तो एकदम उदास राहायला लागला. त्याचा आहार कमी होऊन अशक्तपणा वाढला होता. कुटुंबात त्याचे बोलणे कमी झाले होते. त्याच्यातील हा बदल पालकांच्या लक्षात आला. त्यांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. आता त्याच्यात सुधारणा झाली आहे.
बटण, गांजा दोन्हीही
अकरावीत शिकत असलेल्या एका १८ वर्षीय नवतरुणाला बटण आणि गांजा दोन्हीचे व्यसन जडले होते. त्याच्या कॉलेजजवळच या गोष्टी सहजतेने मिळत होत्या. त्याचा स्वभावसुद्धा रागीट झाला होता. घरातील साहित्याची तोडफोड करणे नेहमीचेच झाले होते. नातेवाइकांना उलटून बोलणे वाढत जात होते. डॉक्टरांकडे समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार कमी झाला.
तरुण-तरुणींनी स्वतःवर विश्वास ठेवणे, प्रेम करणे गरजेचे आहे. स्वतः सोबत कुटुंबावरही विश्वास ठेवा. समस्या जीवनात येणार आहेच. पण, व्यसन त्यावर उपाय नाही. कोणतीही समस्या कायम नाही. नशेच्या विळख्यापासून स्वतःला तरुणांना दूर ठेवणे आवश्यक आहे - डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार समुपदेशक (Latest Marathi News)
कॉलेज अन् अभ्यासही बंद
शहरातील अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत असलेला एक २० वर्षीय तरुण अभ्यासात लक्षच देत नव्हता. घराबाहेरचा त्याचा वावर वाढला होता. लहानपणापासून असलेल्या मित्रांऐवजी नवीनच मित्र दिसू लागले. तो कॉलेजलाही जात नव्हता. त्याला ‘बटण’चे व्यसन जडले. हे पालकाच्या लक्षात आले. त्यांनी त्याला समजावून सांगितले. पण, उलट तरुणाने वडिलांवर हात उचलला. ‘मला माझे जीवन जगू द्या’ असे त्याचे म्हणणे होते. त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे लागले.
मुलीची बदलवी लागली शाखा
शहरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी एक २५ वर्षीय तरुणी सधन कुटुंबातील आहे. तिचे कुटुंबही उच्च शिक्षित आहे. तिला सिगारेट, गांजाची सवय लागली. यातून विसरभोळेपणा वाढल्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येत होता. ही सवय वाढत जात होती. तणावही वाढला होता. ती डिप्रेशनमध्ये गेली. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचा अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी तिची शाखा बदलण्यात आली.
पोलिस कधी देणार लक्ष?
पोलिस किरकोळ कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत. यामध्ये गुन्हे शाखेतील ‘तरबेज’ अधिकारी आणि कर्मचारी आघाडीवर आहेत. पण, बटण आणि गांजावर या मंडळीचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम एका अख्ख्या पिढीवर होत आहे. त्यामुळे ते याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)