नागपूर ः कोरोना महामारीमुळे गेल्या १५० दिवसांत भारतातील किरकोळ व्यापाऱ्यांचे अंदाजे १९ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अनलॉक होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही देशातंर्गत व्यापारात घसरण सुरूच आहे. त्यामुळे देशातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्राहकांनीही दुकानांकडे पाठ फिरविल्याने विक्री मंदावली आहे. त्यात इ कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत व्यवसाय करीत असल्याचाही फटका पारंपरिक व्यवसायांना बसला आहे.
देशातील २० शहरांतील किरकोळ व्यापाराचा आढावा घेण्यात येतो. कारण या शहरातूनच राज्यातील इतर भागात याच ठिकाणांहून वितरण करण्यात येते. त्या शहरांमध्ये दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, सुरत, लखनऊ, कानपूर, जम्मू, कोचिन, पटना, लुधियाना, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहटी या शहरांचा समावेश आहे. या शहरातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच हे धक्कादायक आकडे पुढे आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी दिली.
देशातील किरकोळ व्यापारावर सर्वस्तरातून आघात होत असल्याने अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. तातडीने या स्थितीवर नियंत्रण न मिळविल्यास देशातील २० टक्के दुकाने बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे. देशात एप्रिल महिन्यात पाच लाख कोटी, मे'मध्ये साडेचार लाख कोटी, जूनमध्ये चार लाख कोटी आणि 15 जुलैपर्यंत 2 लाख 50 हजार कोटींच्या व्यवसायाचे नुकसान झालेले आहे. कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही घाबरलेले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्राहकही बाजारात खरेदीसाठी येण्यास इच्छुक नाहीत.
शेजारील राज्य आणि शहरातील खरेदीदारही कोरोनाच्या भीतीमुळे दुसऱ्या शहरात जाणे टाळत आहे. तसेच आतर जिल्हा व राज्य बंद आहेत. परिवहन सुविधाही बंद असल्याने खरेदीदारांनीही बाजारांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे देशातील किरकोळ व्यापाऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
देशातील सर्वच बाजारात सन्नाटा असल्याने व्यापारीही सायंकाळी पाच वाजताच दुकाने बंद करून घर जवळ करू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनलॉकनंतरच्या कालावधीतही फक्त 40 टक्केच ग्राहक बाजारात खरेदीसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळेही व्यापाऱ्याचा व्यवसाय प्रभावित झालेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप व्यापाऱ्यांसाठी कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना सशक्तपणे उभे राहणे सध्यातरी कठीणच आहे. या व्यापाऱ्यांवर व्याज देण्याचा दबाव टाकण्यात येऊ नये, अशी मागणी कॅटने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.