बेशिस्त वाहनचालकांना चाप

Uncertainty-driver-Crime
Uncertainty-driver-Crime

राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित
मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश नुकतेच राज्य सरकारने पोलिसांना दिले होते, तर नियम मोडणाऱ्या ४२ हजार ७२३ जणांचे पोलिसांनी समुपदेशन केले आहे. 

अपघातांची संख्या वाढत असल्याने त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एम. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील चर्चेनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचे परवाने तीन महिन्यांकरिता रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जास्त वेगाने वाहन चालवणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, मालवाहू वाहनातून जास्त मालाची वाहतूक करणे, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे अशांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यातील विविध पोलिस आयुक्तालये आणि महामार्ग पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. महिन्याभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ९४ हजार ७०५ जणांवर पोलिसांनी खटले दाखल केले, तर २ हजार ९३० जणांचे वाहतूक परवाने तीन महिन्यांकरिता निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांचे परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. परवाने रद्द झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होतील. जर परवाना रद्द झाल्यानंतरही चालक वाहन चालवताना आढळल्यास त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल.
- विजय पाटील, पोलिस उपायुक्त, (मुख्यालय) महामार्ग पोलिस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com