
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांला 512 किलोच्या कांद्याचे मिळाले 2 रुपये; फडणवीस म्हणाले, जीआर...
राज्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बार्शी येथील राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा असतो, तो कमी प्रतीचा असतो. त्याला १०० ते १५० भाव मिळतो. तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५०० ते १४०० रुपये दर मिळतो. या पद्धतीने चव्हाण यांना ५१२ रुपये आले. मात्र त्यांच्या हातात दोन रुपये आले. त्याच कारण म्हणजे एकूण रकमेतून वाहतुकीचा खर्च वजा करण्यात आला.
२०१४ साली आपण जीआर काढला आहे. त्यात आपण कमी प्रतिच्या दरातून वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही. मात्र तो खर्च वजा केल्याने शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले. ही बाब लक्षात येताच संबंधीत सूर्या व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या मुद्दावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली होती.
आपल्या बाजुचे तीनही देश अडचणीत आहे. त्याच्याकडे परकीय चलनाचा तुटवडा आहे. त्यामुळे तीनही देशांनी आयात बंद केली आहे. शिवाय कर्नाटक, राजस्थान या राज्यात कांदा पिकविण्यात येत आहे. त्यामुळे निर्यात करण्याची संधी नाही. आता याबाबत काय करता येईल, त्यासाठी बैठका घेण्याचा काम सुरू असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं.