Diwali 2019 : काय आहे नरक चतुर्दशीची कहाणी? अशी आहे परंपरा

Diwali-Naraka-Chaturdashi
Diwali-Naraka-Chaturdashi

नरक चतुर्दशी

अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाणाऱ्या नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते.सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून स्नान केले जाते.

- शेणामातीने सारवलेल्या व रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गु णांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा, सारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही अस्मानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे, यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते.

- शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात.
- सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा उजळवला जातो. या वेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते.
- काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून, त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. कोकणात कारीट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून `गोविंदा`चा तीन वेळा पुकारा केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते.

- नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. पहाटे उटण्याने, तेलाने अंगमर्दन करून स्नान केले जाते. अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.  

- अकाली मृत्यू येऊ नये म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी `यमतर्पण` करायला धर्मशास्त्राने सांगितले आहे. अकाली, अपघाती मृत्यू येऊ नये म्हणून यमाला चौदा नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करायला सांगितले आहे.
- पहाटे यमासाठी नरकात म्हणजे घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. नरकात गेलेल्यांचीही आठवण ठेवण्यासाठी व त्यांना शुभ चिंतण्यासाठी ही पणती उजळण्यात येते.
- या दिवशी संध्याकाळी हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी, असे वर्षक्रियाकौमुदी आणि धर्मसिंधु या ग्रंथांमध्ये सांगितले आहे.

नरक चतुर्दशीची कहाणी

या सणाची एक पुरातन कहाणी आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर (नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली. तसेच देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडले परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे.

यादिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णांकडे एक वर मागितला की, या तिथीला पहाटे जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com