आठवणींतले कुसुमाग्रज... 

Kusumagraj
Kusumagraj

माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कविता शिक्षकांनी शिकवली. कवितेचा अर्थ समजावून सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नाशिकचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा उफाळून आली. मधल्या सुटीत मित्रांशी बोलताना चंदन बेदरकर नावाचा विद्यार्थी मला म्हणाला, ‘अरे अरविंद, आम्ही तात्यासाहेबांच्या शेजारीच राहतो. मी तर रोजच तात्यांना भेटतो.’

यावर मी चंदनला म्हटले, ‘अरे, तू मला तात्यांकडे घेऊन जाशील काय?’ संध्याकाळी तात्यांना भेटायला जायचे ठरले. ठरल्याप्रमाणे मी चंदनबरोबर तात्यांच्या घरी पोचलो. तात्यांनीच दार उघडले. मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मी चंदनच्याच वर्गात आहे, असे सांगताच ‘व्वा छान’ म्हटले. कोणते विषय विशेष आवडतात असे विचारताच मराठी आणि कविता तर आनंदाची गोष्ट आहे. ‘तुला कोणती कविता आवडते,’ असे तात्यांनी म्हणताच सकाळी शिक्षकांनी शिकवलेली ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ ही कविता म्हटली. तात्यांनी शाबासकी आणि टेबलावरच्या दोन सफरचंदाच्या फोडी दिल्या. मी तात्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. तात्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा तो परिसस्पर्श आठवला की मन आनंदून जाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माध्यमिक शिक्षणानंतर पदवीच्या शिक्षणासाठी मी पुण्यास जाण्यासाठी वडिलांचा विरोध होता. मात्र तात्यांच्या संमतीमुळे पुण्याला शिक्षणासाठी पाठविण्यास वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीस असे. 

वृत्तपत्र विद्या पदवी प्राप्त केल्यावर मी नाशिकच्या एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ केला. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती झाली. कालांतराने नाशिक विभागासाठी बदली झाली याच काळात ‘सप्तशृंग दर्शन’ पुस्तक लिहिण्याद्वारे ग्रंथलेखनाकडे वळलो. पुस्तकाला तात्यांचा आशीर्वादपर अभिप्राय लाभल्याने मी सुखावलो. माझी १९८६मध्ये पुण्याला बदली झाली. 
दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्‍चय केला होता. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. तात्यांनी माझ्या अभ्यासाचे आणि परिश्रमाचे कौतुक केले. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण होऊन मला डॉक्‍टरेट पदवी मिळाली. हे समजताच तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले. 

माझ्या प्रबंधावरून ‘होय होय वारकरी’, ‘अभंगाची वारी’ ही दोन पुस्तके प्रकाशित केली. नाशिकला गेल्यावर तात्यांना भेटून दोन्ही पुस्तके दिली. याआधी १९९५ मध्ये माझे ‘चिंता आणि चिंतन’ पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याबद्दल आशीर्वादपर अभिप्राय मी पुस्तकाच्या मलपृष्ठावर तात्यांच्या अक्षरातील छायाचित्र घेऊन जसाच्या तसा छापला होता. 

तात्यांच्या वेळोवेळी झालेल्या सर्वच भेटींचे सुवर्णक्षण तब्बल २५-३० वर्षांच्या कालावधीतील आठवणींचा खजिना आहे. तात्यासाहेबांची माझी शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. तात्यांची प्रकृती बरी नसल्याने हॉस्पिटलमधून उपचारांनंतर त्यांना नुकतेच घरी आणले होते. दहा दिवसांनी कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजविणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला. आजही कुसुमाग्रजांच्या सहवासातील ते सुवर्णक्षण आठवताना डोळे पाणावतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com