शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतरच्या ह्या पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपावरही टीका केली आहे. (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, यावरही उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की, आज तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती हास्यजत्रेचा दुसरा सिझन वाटत नाही का? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झालेले दिसतायत. त्यावर उद्धव ठाकरेंनी 'उपरवाले की मेहरबानी' असं खोचक उत्तर दिलं. त्यावर हा उपरवाला कोणा असा प्रश्न संजय राऊतांनी केला, त्यावर 'ज्याचं त्यालाच ठाऊक' असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "त्यांच्याबरोबर असं का वागले हे मला कळलं नाही. पण ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले जुने जाणते आजही माझ्यासोबत संपर्कात आहेत. हे लोक निष्ठेने भाजपात आहेत. उगाच त्यांच्याबद्दल त्यांना शिवसेनेत यायचंय वगैरे असा काही माझा फालतू किंवा पोकळ दावा नाहीये. त्यांना या गोष्टी पटत नाहीत तरी ते निष्ठेने भाजपाचं काम करतायत."
राज्यातल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सत्ता स्थापनेची घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चितच असताना अचानक फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. तसंच आपण बाहेरुन पाठिंबा देत असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. काही वेळातच शपथविधी होणार अशी घोषणाही झाली. मात्र अचानक मोदींपासून नड्डांपर्यंत भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.