महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी संपवितात जीवन! २०२०-२१च्या तुलनेत आत्महत्यांमध्ये वाढ; ४ वर्षांत ११ हजार ८४ आत्महत्या; दुष्काळाची मदत अजूनही नाहीच

२०२० व २०२१च्या तुलनेत मागील दोन वर्षांत राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असून दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील माहितीवरून समोर आले आहे.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : कांद्याला अपेक्षित दर नाही, उसाची एफआरपी एकरकमी मिळत नाही, इतरही शेतमालाचे दर गडगडलेले आहेत. दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळालेले नाही. गतवर्षीचा कापूस, भुईमूग, तूर, कांदा व मूग या पिकांचा विमा देखील मिळालेला नाही. अशा चिंताजनक स्थितीचा वारंवार सामना करताना २०२० व २०२१च्या तुलनेत मागील दोन वर्षांत राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असून दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील माहितीवरून समोर आले आहे.

राज्यात २०२० मध्ये २५४७ तर २०२१मध्ये २७४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मागील दोन वर्षांत राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असून २०२२ मध्ये २९४२ तर २०२३ मध्ये २८५२ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने मिळावा म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयात विशेषत: महसूल कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश यापूर्वीच सरकारने दिले. परंतु, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना अद्याप शासकीय योजना असो वा शासकीय मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावेच लागतात ही वस्तुस्थिती आहे.

सरकारकडून अजूनही शेतमालाला हमीभाव मिळालेला नाही. नैसर्गिक आपत्तीत नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळत नाही, मिळणारी भरपाई विलंबाने मिळते. त्यामुळे मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह, खासगी सावकारांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा व बॅंकांचा तगादा, यामुळे शेतकऱ्यांना जगाचा निरोप घेण्याची वेळ येत असल्याचीही वस्तुस्थिती आहे. जळगाव, परभणी, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल असल्याचेही मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

मूग, कापूस, भुईमूग, कांदा, तुरीचा विमा नाहीच

एक रूपयात पीकविमा असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. पण, कापूस, मूग, भुईमूग, कांदा व तूर या पिकांना अजूनपर्यंत पीकविमा मिळालेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख १८ हजार १४४ शेतकऱ्यांनी त्या पाच पिकांचा विमा भरला, पण अद्याप त्यातील एकालाही विम्यातून भरपाई मिळालेली नाही. पीक कापणीचे प्रयोग करून त्याचा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविण्यात आला, पण त्याठिकाणाहूनही काहीच निर्णय झालेला नाही अशी माहिती सोलापूर कृषी विभागाने दिली. अशी स्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे.

दोन वर्षातील विभागनिहाय आत्महत्या

  • विभाग २०२२ २०२३ २०२४

  • कोकण ००० ००० ०००

  • पुणे २१ ३१ ३

  • नाशिक ३८८ २९३ २३

  • छ.संभाजी नगर १०२३ १०८८ ८२

  • अमरावती ११७१ ११४० ७९

  • नागपूर ३३९ २९९ ३४

  • एकूण २,९४२ २,८५१ २२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com