
शिंदे गटातील 15 आमदारांच्या घरांना आता थेट केंद्राकडून सुरक्षा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदरांसह सेनेविरोधात बंड पुकारले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना आक्रमक झाली आहे. या बंडखोर आमदारांविरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या आमदारांना आता थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. (central govt provide security to shiv sena mla family)
शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. राज्यातील शिवसेना आक्रमक झाल्याने बंडखोर आमदारां विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळं केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तोडफोडीच्या हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत भाजपवर टीका केली आहे. या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.