
तात्या लांडगे
सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. या गुन्ह्यात आपल्याला दोषमुक्त करावे, असा अर्ज मनीषा यांनी जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे दाखल केला आहे.
दाखल फिर्यादीनुसार १७ एप्रिल रोजी संशयित आरोपी मनीषा यांनी आपल्यावरील अन्यायसंदर्भात डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. उमा वळसंगकर, डॉ. अश्विन वळसंगकर व डॉ. शोनाली वळसंगकर या चौघांना ई-मेल पाठवला होता. मनीषा यांनी खोटारडे व घाणेरडे आरोप केल्याने डॉ. शिरीष व्यथीत झाले होते. त्यानंतर मनिषा यांनी डॉक्टरांना लेखी माफीनामा दिला, तरीपण दोन्ही मुलांना मारून स्वत: रुग्णालयासमोर जाळून आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची धमकी त्यांनी दिली होती. त्यामुळे १८ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतील गोळी झाडून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आणि डॉ. अश्विन यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी १९ एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास मनीषाला अटक केली. तपासाअंती पोलिसांनी मनीषाविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने २५ मे रोजी मनीषाला जामीन मंजूर केला. आता मनीषा यांनी ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे. यात मनीषातर्फे ॲड. नवगिरे ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील काम पाहात आहेत.
सरकार पक्षाला २६ सप्टेंबरपर्यंत मुदत
गुन्ह्यातील संशयित मनीषाने चौघांना ई-मेल पाठविला आणि त्यानंतर माफीनामाही दिला. त्यात भावनेच्या भरात पत्र पाठविल्याचे नमूद केले. मनीषाने पगार व अधिकार कमी केल्याबाबत तक्रार केली होती. ई-मेलमधून धमकी दिली, असे गृहीत धरले तरी त्यामध्ये मनीषाचा हेतू दिसून येत नाही. तसेच आरोपीचे कृत्य व आत्महत्या, यात डॉक्टरांनी आत्महत्या करावी असाही थेट संबंध दिसत नाही. दोषारोपपत्रातील आरोपांचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता आणि डॉक्टरांची आत्महत्या व मनीषावरील आरोपांचाही आत्महत्येशी थेट संबंध दिसून येत नाही. या प्रमुख मुद्द्यांवर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे २६ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे.
मुदत संपण्याआधी वकिलांचा अर्ज
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर १९ जून रोजी हा खटला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग (कमिट) केला होता. त्यानंतर ६० दिवसांत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करता येतो. ही मुदत संपण्याआधी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी ॲड. नवगिरे यांनी मनीषातर्फे हा अर्ज केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.