फादर्स डे विशेष :  पितृत्व त्यागणारा पिता 

फादर्स डे विशेष :  पितृत्व त्यागणारा पिता 

खरंतर पिता हा दोन अक्षरीच पण प्रचंड जबाबदारीने ओथंबुन भरलेला शब्द आहे. तो नुसता शब्दच नाही तर तो इतिहास पण आहे. या बाप नावाच्या इतिहासानेच तर सारे जग समृद्ध केले आहे. आजच्या काळात लोक स्वतःला रक्ताचा वारसदार असावा यासाठी विशेष महत्त्व देताना दिसतात. मात्र, राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी बुद्ध, फुले, शाहू,आंबेडकर या युगंधरांच्या विचारांचा वारसा स्वीकारून विचारांना विचारांचाच वारसा देण्यासाठी पितृत्वाचा त्याग करून रक्ताच्या वंशापेक्षा विचारांच्या नात्याला स्वीकारण्याचा आधुनिक काळात उभा केलेला आदर्श तरुणांसाठी दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे

डॉ हर्षदीप कांबळे हे आपल्या प्रशासकीय कर्तबगारी मुळे व विविध सामाजिक उपक्रमामुळे सर्व परिचित आहेत. त्यांनी राज्याच्या विविध विभागात महत्त्वाच्या पदावर कौतुकास्पद काम केले आहे. त्यातही तरुणांमध्ये त्यांच्या विविध सर्जनशील कामामुळे ते फार लोकप्रिय आहेत. नुकतेच डॉ.कांबळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा निर्णय घेतला असून स्वतःला एकही अपत्य होऊ द्यायचे नाही असे ठरवून समाजातील गरजू मुलांना मदत करायची आणि घडवायचे असा निर्धार केला आहे. डॉ कांबळे यांच्या पत्नी रोचना व्हॅनीच कांबळे ह्या थायलंड येथील मोठ्या व्यवसायिक आहेत.

डॉ कांबळे हे यवतमाळ इथे  कलेक्टर, औरंगाबाद येथे मनपा आयुक्त, अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त आणि आज राज्याच्या उद्योग विभागाचे आयुक्त म्हणून काम करताना सरकारच्या प्रचंड मोठ्या लवाजम्यात असलेला  उद्योग विभाग गेल्या तीनेक वर्षात नवनव्या योजनांनी, उद्योग धोरणांनी त्यांच्या तरुणांनी उद्योजक बनावे या योजनांमुळे,चर्चेत आले. 

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांची टेलिव्हिजनवर एक मुलाखत आली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांचे विचार ऐकून लॉकडाऊनमध्ये मरगळलेल्या मनात प्रकाशाचा झोत टाकून गेला. एका बाजुला संकटाच्या कुशीत लपलेल्या व्यवसायाच्या संधी दिसल्या तर दुसरीकडे 'मी'पणातून बाहेर येण्यासाठी, जगातले सारे काही आपल्याच खिशात असावे या लोभी विचारापासून दूर जाण्याची शिकवण या मुलाखतीतून मिळाली. डॉ.कांबळे सरांच्या पर्सनल लाईफ बद्दलच्या आश्चर्यचकित करणाऱ्या आणि मनाला भारावून टाकणाऱ्या गोष्टीही समजल्या.
 
डॉ.कांबळे यांना स्वतःच्या मुलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून मला क्षणभर काय ऐकतोय यावर विश्वास बसत नव्हता. डॉ कांबळे उत्तर देताना म्हणाले की "आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की स्वतःला एकही अपत्य होऊ द्यायचे नाही. तर समाजातीलच गरजू मुलांनाच मदत करायची आणि घडवायचे असा निर्धार केला आहे." 

पुढे बोलताना म्हणाले "मी जिथे ही जातो तिथे खूप सारे मुले माझ्यासोबत काम करीत असतात. त्यातील काही मुले खूप हलाखीच्या परिस्थितीत आहेत. त्यांना आम्ही मदत करतो. हे करीत असताना एक जाणवायला लागले की युवकांसाठी काम करायचे असेल तर आपल्या गरजा कमी करायला हव्या. तसेच जास्त काम करायचे असेल तर आपल्यावरील जबाबदाऱ्या सुद्धा कमी करायला पाहिजे. आपण स्वतः सांगितल्याप्रमाणे मोहापासून दूर असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार करून त्यावर होणारे परिणाम हे सुद्धा लक्षात घेऊन आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की, स्वतःला एकही अपत्य होऊ दयायचे नाही. समाजातील गरजू, गरीब मुलांनाच मदत करायची, त्यांनाच घडवायचे आणि मोठे करायचे. असा आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे. 

यापुढे आमची जी साधन संपत्ती आहे ती गरजू, गरीब मुलांवरच खर्च करणार असा निर्धार केला आहे. हेच आमचे कर्म समजतो. तसेच हीच आमची मुलं मानून आम्ही त्यांना पुढे आणायचे ठरविले आहे. या मुलांपासून आम्हाला खूप प्रेम मिळते, नेहमी ही तरुण मुले दिवस रात्र काम करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे आमच्या स्वतःच्या अपत्यामध्ये गुंतून राहायायचे नाही असे खूप विचाराअंती ठरवले असल्याचे यावेळी डॉ.कांबळे म्हणाले. 

आजच्या या प्रचंड स्वार्थी जगात बहुतांश लोक स्वतःच्या परिवारापलीकडे कोणासाठीच जगताना दिसत नाहीत.जो तो आपली पत्नी आणि मुलं यांच्या पलीकडे आपले जगात कोणी नाही आणि इतर कोणाला आपले समजायचे नसते याच मतलबी भावनेतून जगताना, वावरताना दिसत आहेत. प्रत्येक जण आज जमेल त्या मार्गाने जमेल ते धन जमा करून आपली मुलं आणि परिवाराला कसे सुखासीन आयुष्य जगवता येईल यासाठी धडपड करताना पाहायला मिळतायत. एका धर्मपरंपरेनुसार आपला वंश बुडू नये म्हणजे मुलगा जन्माला यावा असा आग्रह कर्मकांडात धरला. मुलगी नको म्हणत अनेकांनी अनेक मुलांनाच फक्त जन्माला घातले व कित्येक सावित्रिच्या लेकींचा गर्भातच खून केला.

इथे मात्र आजच्या काळातील राजेशाही पद्धतीचे जीवन असणाऱ्या प्रशासकिय सेवेतील अधिकाऱ्याने व त्यांच्या सुविद्य पत्नीने मानव जीवनातील सर्वोच्च आनंद, नैसर्गिक हक्क नाकारला व समाजातल्या 'नाही रे' वर्गातील मुलांना आपलंसं करण्यासाठी, त्यांच्या सर्वार्थाने संगोपनासाठी आपलं स्वतःच मुलंच नको, त्याची जबाबदारीच नको असा दुरदृष्टीचा निर्णय घेऊन एका अर्थाने समाजातील गरीब होतकरू व गरजवंत मुलामुलींना फार मोठी मायेची ऊब दिली आहे.

याशिवाय समाजात आजही इतिहासाच्या पानात असलेली ‘फुले,शाहू आंबेडकर ‘ यांची विचारधारा कोणीतरी कांबळे व्हॅनीच यांच्या सारखी मायाळू, प्रचंड त्यागी, दानी व इतरांना प्रकाशमान करणारी माणसं हृदयात बुद्धाच्या प्रज्ञेचा, करुणेचा, मैत्रीचा झरा घेऊन जगाला, आपल्या सभोवतालच्या सर्वांना सुखावण्यासाठी, आपल्या सुखांचा त्याग करून या विश्वाला समृद्ध करत असतात. ती आपल्या विवेकी जगण्याने माणसांच्या जगण्याला,  माणुस असण्याला अर्थ आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात.

समाजातील इतर मुलं आपलीच आहेत त्यांनाच पुढे घेऊन जाऊ, त्यांनाच मदत करू, ती आपली आहेत म्हणून सांभाळून, मोठी करू हा विचार या देशात बुद्ध, फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनी जन्माला घातले आणि त्यांचे विचार या देशाने स्वीकारले आहेत याची पोच देणारा आहे. समतेच्या क्रांतीनायकाचा विचार ज्याच्या हृदयात आईने रोवला त्या विचारांचा मोठा वृक्षच डॉ हर्षदीप कांबळे यांच्या हृदयात बहरल्याचे दिसून येते.

महापुरुषाचा विचारवारस डॉ हर्षदीप कांबळे यांच्या रूपाने पुन्हा याची देही पाहता आला. माझ्या  सारख्या तरुणाला तर हे जीवनभर प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व राहणार आहे. एवढा कुणी त्याग करू शकतो, तेही आजच्या परिस्थितीत आणि तेही एवढ्या मोठ्या पदावर असलेला माणूस..आणि ह्या निस्सीम त्यागाला त्यांचा पत्नीचीही साथ आहे. बुद्धाच्या विचारावर चालणाऱ्या, त्यांचे विचार प्रत्यक्षात जगणारा आणि कुशल कम्म करणाऱ्या या त्यागी पित्याच्या विचारांचा वारसा फादर्स डे निमित्ताने आम्ही असाच पुढे घेऊन जाऊ.

fathers day special article on harshdip kamble by jaypal gaikwad

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com