Ujjani Dam :दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण?
Ujjani Damsakal

उजनीतून जानेवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन! धरण १०० टक्के, शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात तीनवेळा मिळणार पाणी; डिसेंबरअखेर कालवा सल्लागार समितीची बैठक

उजनी धरण सध्या १०० टक्के भरले आहे. यंदा शेतीसाठी तीन आवर्तने सोडली जाणार असून पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचे नियोजित आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबरअखेर नियोजित आहे. त्यात उन्हाळ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन निश्चित होणार आहे.
Published on

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण सध्या १०० टक्के भरले आहे. यंदा शेतीसाठी तीन आवर्तने सोडली जाणार असून पहिले आवर्तन १५ जानेवारीपासून सोडण्याचे नियोजित आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक डिसेंबरअखेर नियोजित आहे. त्यात उन्हाळ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन निश्चित होणार आहे.

उजनी धरणावरील उजव्या व डाव्या कालव्यातून जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार हेक्टर जमिनीला थेट पाणी मिळते. रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्र वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः: पाच लाख ३० हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून त्यात पावणेतीन लाखांपर्यंत ज्वारीचे क्षेत्र आहे. दुसरीकडे खरिपाचे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र आहे, पण लागवडीखालील क्षेत्र चार लाखांहून अधिक हेक्टर आहे.

हंगामी बागायत क्षेत्रासाठी उजनीचा मोठा आधार आहे. आता शिरापूर, बार्शी, आष्टी, सांगोला, मंगळवेढा, एकरूख व लाकडी निंबोडी अशा नव्या उपसा सिंचन योजना आगामी एक-दोन वर्षात पूर्ण होतील. त्यातून आणखी एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उजनी धरण अजूनही १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा धरणातून तीनवेळा पाणी मिळणार आहे. त्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती आहे.

सोलापूर शहरासाठी नदीतून नाही पाणी

सोलापूर शहरासाठी दरवर्षी उजनीतून चारवेळा १६ ते २० टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडावे लागत होते. नदीतून सोडलेल्या पाण्यापोटी महापालिकेला दरवर्षी १४ ते १५ कोटी रुपये द्यावे लागत होते. पण, आता समांतर जलवाहिनीतून पाणी घेतले जात असल्याने १० कोटींची बचत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नदीतून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाला कळविलेली नाही.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल नियोजन

यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सध्या शेतकऱ्यांची उजनीतून पाणी सोडण्याची मागणी आलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जानेवारीत पहिले आवर्तन सोडले जाईल. तत्पूर्वी, कालवा सल्लागार समितीची डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत बैठक होईल. त्यात उजनीतील पाण्याचे नियोजन निश्चित होईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com