राज्यात वाघांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांच्या जीवितासह शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, बिबट्यांच्या हल्ल्यामुळेही जीवितहानी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी सौर कुंपण फेन्सिंग करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून साखळी कुपंणाबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.
भंडारालगत कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोन जवळील गावात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे जनतेत रोष आहे. बिबट्याच्या हल्ल्यात देखील या परिसरात जीवितहानी होत आहे.
त्यामुळे वाघ आणि बिबटे ज्या गावाच्या आसपास येतात त्या गावांना साखळी कुंपण घालावे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून केली.
वाघ आणि बिबट्यांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावांची नोंद घेऊन त्याठिकाणी साखळी कुंपण घालावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, ‘२००० मध्ये वाघांची संख्या १०१ होती आता २०२५ मध्ये ती ४४४ पर्यंत वाढली आहे. वाघांचे हल्ले रोखण्यासाठी सौर कुंपण करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. साखळी कुंपणाबाबत आम्ही पाठपुरावा करू.’
उद्या विशेष बैठकीचे आयोजन
वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जीवितहानी होत आहे, याबाबत विविध लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केल्याने या प्रश्नावर संबंधित लोकप्रतिनिधींची विशेष बैठक विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शुक्रवारी (ता. ७) घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. या बैठकीत वाघ आणि बिबट्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.