जळगाव : अखिल भारतीय महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे एका मंचावर आले होते. दरम्यान या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर खडसे फडणवीसांच्या कानात काहीतरी बोलताना दिसले होते यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसे नेमकं काय बोलले याबाबत खुलासा केला आहे.
गिरीश महाजन जळगावात बोलताना, एकनाथ खडसे यांनी मला आणि फडणवीसांना एकत्र बसून मिटवून टाकू, असे म्हटल्याचा खुलासा केला आहे. पुढे बोलताना खडसेंना काय मिटवायचं आहे ते त्यांनाच माहिती असेही महाजन म्हणाले आहेत. नाशिक येथील भाषण झाल्यावर खडसे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.
महाजन म्हणाले की, भाषण झाल्यावर खडसे माझ्याजवळ आले आणि म्हणाले की एकदा आपण बसू, मिटवून टाका, जाऊद्या असं त्यांनी आम्हाला म्हटलं. त्यांचं सध्या जे काय चाललंय त्यावरून त्यांचं काय मिटवायचं होतं ते गर्दी आणि गोंधळामुळे विचारता आलं नाही. पण ते त्यावेळी खाली वाकून म्हणाले की जाऊद्या, बसू एकदा, आता त्यांच्या मनात बसल्यावर काय मिटवायचं आहे ते माहित नाही असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
नेमकं काय झालं होतं?
अखिल भारतीय महानुभाव संमेलन कार्यक्रमात खडसे वेगळ्या खुर्चीवर भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसल्याचे पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. दरम्यान या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी भाषणही केले. भाषण संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितलं असेल? याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर गिरीश महाजन यांनी खडसे काय बोलले होते याबद्दल खुलासा केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.