PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaesakal

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना गुरूवारी मिळणार प्रत्येकी २००० रुपयांचा हप्ता

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना एक हजार ८७० कोटींचा चौदावा हप्ता गुरुवारी (ता. २७) वितरित होणार आहे. त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत.

सोलापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना एक हजार ८७० कोटींचा चौदावा हप्ता गुरुवारी (ता. २७) वितरित होणार आहे. कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी तयार ठेवली असून त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत.

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील १०० लाख शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या योजनेप्रमाणे ‘मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू केली जाईल, अशी घोषणा झाली. चार महिने होऊनही अद्याप शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू झाली नाही. कृषी व महसूल विभागाकडून योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारला सादर केली गेली आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे.

आता केंद्र सरकारचा चौदावा हप्ता वितरित झाल्यानंतर पुढील काही दिवसांत राज्याची योजना देखील सुरु होईल, असा विश्वास कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या योजनेअंतर्गत १०० लाख शेतकरी पात्र होऊ शकतात, पण अजूनही १४ लाख ३४ लाख शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ६० हजारांहून अधिक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘या’ चार बाबींची करा पूर्तता

  • - १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र

  • - सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

  • - लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

  • - बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

  • - शेती विकलेले लाभार्थी योजनेसाठी पात्र असणार नाहीत

राज्याचा पहिला हप्ता १५ ऑगस्टपूर्वी

केंद्र सरकारच्या वतीने २७ जुलैला योजनेचा चौदावा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर पुढील १५ दिवसांत राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री नमो शेतकरी महानस्मान’ योजनेचा पहिला हप्ता वितरित होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील जवळपास ८६ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता मिळणार आहे. केंद्राच्या योजनेचेच निकष राज्याच्या योजनेसाठी लागू असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com