पुसद (जि. यवतमाळ) : आज चैत्र मासारंभ. अर्थातच गुढीपाडवा (Gudipadva). मराठी नववर्षाची सुरुवात. आपल्या शेतीप्रधान देशात नवीन वर्षाला शेती मशागतीच्या कामांची उत्साहात सुरुवात होते. वर्षभर शेतीकामात राबणारा सालगडी गुढीपाडव्यापासून नवीन कपडे परिधान करून नव्या दमाने कामांना सुरुवात करतो. शेती मालक व सालगडी यांच्यातील ऋणानुबंध वर्षानुवर्षे जपले जात असताना अलीकडे शेतीचे आधुनिकीकरण (Agriculture) व यांत्रिकीकरणामुळे शेती संस्कृतीतील सालगडी (Salgadi) हरवत चालला आहे.
शेतमालकाच्या शेतात ठरावीक मानधनावर वर्षभर काम करणारा सालगडी शेती संस्कृतीतील महत्त्वाचा धागा आहे. शेतीची मशागत, पिकांची राखण, गुराढोरांचा सांभाळ अशी शेतीची कामे सालगडी करतो. भल्या पहाटे चार वाजतापासून तर रात्री आठपर्यंत तो शेतीत राबतो. शेतमालकाने सोपवलेली जबाबदारीची कामे इमानदारीने करणे हा त्याचा धर्म.
त्या मोबदल्यात अन्नधान्य, कपडालत्ता, पैसा-अडका सालगड्याला पुरविणे ही शेतमालकाची जबाबदारी. पूर्वी शेत मालकाची ‘शेती, पशुधन म्हणजे आपलीच मालकी’ असा आपुलकीचा भाव सालगडीच्या (Salgadi) मनात राहायचा. शेतमालक व सालगडी एकमेकांच्या कुटुंबातील सुख दुःखाचे वाटेकरी होत. सहाजिकच ऋणानुबंधाच्या धागे गुंफल्या जात.
पूर्वी सालगड्याला शेतात पिकलेले ज्वारी, गहू धान्य, तूर डाळ, मिरची व ठरावीक रक्कम दिली जात असे. त्यावर सालगड्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. ग्रामीण भागात आजही ही पद्धत कायम आहे. मात्र, सालगडीचा मोबदला वाढला असून, तो आजमितीला एक लाखाच्यावर पोहोचला आहे. मुख्य म्हणजे शेतीचे आधुनिकीकरण (Agriculture) व यांत्रिकीकरणामुळे सालगडी प्रथा हळूहळू लयाला जात आहे.
शेतीत ट्रॅक्टर, स्प्रिंकलर, आधुनिक अवजारे आल्याने शेती मशागत सोपी झाली आहे. श्रम व वेळेची मोठी बचत होत आहे. सहाजिकच सालगडी वरचा ताण कमी झाला आहे. पूर्वी अन्नधान्यासाठी सालगड्याला (Salgadi) शेत मालकावर विसंबून राहावे लागत असे. अलीकडे शासनाच्या विविध योजनांमधून अत्यल्प दरात रेशन धान्य मिळत असल्याने ही गरज आता संपली आहे.
‘‘चार घरचा मजूर मी
चार घरचा सालगडी
चार वेळा विझवून
ओढतो मग एक बिडी’’
ही सालगड्याची परिस्थिती आता बदलली आहे.
शेत मजुरांना सालगडी म्हणून वर्षभर बंधनात राहण्याची अलीकडे मानसिकता उरलेली नाही. ‘महिनेवारी’ही संपली आहे. शेतीकामात रोजंदारी, गुत्तेदारी व हाती पैसा असा नवीन ट्रेंड शेतीकामात पहावयास मिळत आहे. विशेषतः शेतीच्या कामातील गुत्तेदारी वाढली आहे. तसेच शेती कसणे परवडत नसल्याचे सांगत बरेच शेतकरी बटई वा मक्ताने शेती वाहण्यासाठी देत आहेत.
आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचा परिणाम शेतीवरही झाला आहे. बेरोजगारीमुळे युवक शेतीतून भरघोस उत्पादन व बक्कळ पैसा मिळवीत आहे. शेतीचे तुकड्यात विभाजन झाले आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीत मनुष्यबळ कमी लागत आहे. सहाजिकच पूर्वीच्या शेती संस्कृतीतील सालगड्याची अपरिहार्यता संपत आली आहे. असे असले तरी नांदलेल्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावर सालगड्याचे महत्त्व कमी झालेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.