
शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास
बंड शिवसेनेला नवी नाहीत. गेल्या ३१ वर्षांत शिवसेनेमध्ये तीनवेळा लक्षणीय मोठे बंड झाले. विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे बंड शिवसेनेसाठी चौथे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात १९ जून १९६६ पासून गेली ५६ वर्षे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या शिवसेनेमध्ये संस्थापक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकदाच बंडाचा सामना करावा लागला. मात्र, शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना तब्बल तिसऱ्यांदा बंडाचा सामना करावा लागतो आहे.
बंड पहिले (६ डिसेंबर १९९१) : छगन भुजबळ
मुंबई महापालिकेवर १९७३ मध्ये निवडून आलेल्या आणि नंतर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आणणाऱ्यांमधील प्रमुख नेते आणि तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांनी ६ डिसेंबर १९९१ रोजी बंड केले.
आपल्यासोबत ५२ पैकी २५ आमदार असल्याचा दावा तेव्हा छगन भुजबळ यांनी केला; प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी बारा आमदारांनी बंड मागे घेतले.
तत्कालीन विरोधी पक्षनेतेपदी मनोहर जोशी यांची निवड झाल्यामुळे भुजबळ नाराज होते. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांना मनोहर जोशींनी जातीयवादाचे रंग दिल्याचा आरोप त्यांनी केला.
बंडानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांसोबत राहीले.
बंडाच्या वेळी शिवसेनेचे ५२ आमदार होते. बंडानंतर १९९५ च्या निवडणुकीत आमदारांची संख्या ७३ झाली. त्यावेळी रामजन्मभूमी - बाबरी मशीद वादाचे पडसाद देशभर उमटत होते.
बंड दुसरे (3 जूलै २००५) : नारायण राणे
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असणाऱ्या नारायण राणे यांनी शिवसेनेत ३९ वर्षे काढल्यानंतर ३ जुलै २००५ रोजी बंड केले. मुंबई-कोकण पट्ट्यात शिवसेनेला वाढवण्यात राणे यांचा वाटा होता.
आपल्यासोबत २२ आमदार आणि पाच खासदार असल्याचा दावा राणे यांनी केला. प्रत्यक्षात आठ आमदारांनी भूमिका बदलली.
कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या उद्धव ठाकरेंशी पटत नसल्याचे कारण राणे यांनी दिले. उद्धव ठाकरे, त्यांचे तत्कालीन स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप राणे यांनी केला.
नारायण राणे पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले. २०१७ मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले. २०१८ मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार झाले.
बंडाच्या वेळी शिवसेनेचे विधानसभेत ६२ आमदार होते. बंडानंतर २००९ च्या निवडणुकीत आमदारांची संख्या ४४ पर्यंत घसरली
बंड तिसरे (२७ नोव्हेंबर २००५) : राज ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी बंड केले. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नेमल्यापासून शिवसेनेत सुरू झालेल्या अंतर्गत सत्तासंघर्षाची ही परिणिती होती.
राज यांच्यासमवेत १६ आमदार असल्याचा दावा समर्थकांनी केला; प्रत्यक्षात खुद्द राज यांनी पक्ष फोडला नाही, पण शिवसैनिकांना आपल्याकडे वळविले.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चार कारकुनांची टोळी शिवसेना संपवत आहे, असा आरोप राज यांनी पक्ष सोडताना केला. माझा वाद विठोबाशी (बाळासाहेब ठाकरे) नाही; परंतु त्यांच्याभोवती असलेल्या बडव्यांशी आहे, हे राज यांचे विधान होते.
राज यांनी मार्च २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज यांच्या पक्षाने तेरा जागा जिंकल्या.
राज यांच्या पक्षाची २०१४ च्या निवडणुकीत एका जागेपर्यंत घसरण झाली. तीच घसरण २०१९ मध्येही कायम राहीली.
चौथ्या बंडाची वैशिष्ट्ये
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला शिवसेनेत बंडाचा झेंडा उभा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या १३ ते ३५ अशी वेगवेगळी सांगण्यात येत आहे. शिंदे यांचे बंड अधिक आक्रमक आहे. याची कारणे :
१. शिवसेना पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तेत असताना बंड झाले आहे
२. बंडाचा नेता बलाढ्य नेता आहे; पक्षाचे विधिमंडळ प्रमुख म्हणूनही २० जूनपर्यंत एकनाथ शिंदे होते
३. भाजप हा आजपर्यंतचा सर्वांत बलाढ्य विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत आहे.
४. संभाव्य बंडखोर आमदारांची समोर येणारी संख्या वाढते आहे.
Web Title: History Of Shiv Sena Rebellion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..