
मुंबई - अनेक धक्कादायक घडामोडींनंतर सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारने एक मोठा विजय आपल्या नावे केला. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. मात्र अजुनही एकनाथ शिंदे सरकारवर अनिश्चिततेचे ढग असून सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीवर बरच काही अवलंबून असणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे बहुमत चाचणीसाठीचा शिंदे सरकारचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे. (how easy floor test for eknath shinde)
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164, तर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तर समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि AIMIM चे आमदार तटस्थ राहिले.
शिवसेनेच्या सर्व 39 बंडखोर आमदारांनी भाजप उमेदावर नार्वेकरांना मतदान केलं. त्यामुळे सर्व 39 बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले तरीही विरोधकांकडे बहुमत सिद्ध करण्याएवढं संख्याबळ नाही. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून, त्यापैकी एका आमदाराचे निधन झाले आहे. 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकल्यानंतर एकूण सदस्य संख्या 248 होते, त्यानंतर बहुमताचा आकडा 125 होतो.
सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली आहेत. यापैकी 39 सदस्यांची मते वजा केली तरी हा आकडा 125 वर येतो. दुसरीकडे मतदानात भाग न घेणारे समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि सीपीएमचे आमदार तसेच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनीही उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने मतदान केले तरी त्यांची संख्या 125 पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आमदार अपात्र ठरले तरी भाजपी सत्ता राहणारच आहे. मात्र त्यामुळे मध्यवधी निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण होते.
16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही महत्त्वपूर्ण
आमदाराच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने नवीन गटनेते नियुक्त करून आधीच विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्याला एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 16 आमदारांच्या निलंबनाची मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावरही सरकारचं आणि शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे 16 आमदाराच्या निलंबनाचा मुद्दाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.