महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत येत्या दोन दिवसांत संपत आहे. परंतु, हा कालावधी अपुरा असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
राज्य सरकारने शिक्षकांना बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व गुण तक्ते सादरीकरणासाठी सात दिवस तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमनासाठी नऊ दिवस दिले होते. त्याची मुदत संपली असून अद्याप काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेले नाही. मंडळाच्या संगणकीय प्रणालीत विषयनिहाय गुण भरण्याची मुदत संपत आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली त्यानंतर बंद होणार असल्याचे कळवले आहे. परंतु, दरम्यान संगणकीय प्रणालीत विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती देताना शिक्षकांना पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणे, इंटरनेटची सुविधा विस्कळित होणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बारावीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत; पण मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. त्यामुळे सरकारने संगणकीय प्रणालीत विषयनिहाय गुण देण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.