तुमचा मुलगा चिडचिड करतोय का? सुसंवाद ठेवा, आत्मविश्वास वाढवा नैराश्यापासून मुले राहतील दूर

मुलांसाठी रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा दुःख आणि राग हा आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. त्यावेळी पालकांनी मुलांमधील बदलांचा अचूक वेध घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे.
children
childrensakal
Updated on

सोलापूर : सर्व मुलांची वागणूक वेगळी असते. मुलांसाठी रागावणे, वाईट वाटणे, विचित्र वागणे हे सामान्य आहे, परंतु जेव्हा दुःख आणि राग हा आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकतो, तेव्हा ही चिंताजनक गोष्ट असू शकते. त्यावेळी पालकांनी मुलांमधील बदलांचा अचूक वेध घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे.

मुलाला रागाने चिडचिड होत असेल आणि त्याचे वागणे बदलत असल्यास ते ‘नैराश्य’ असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या अशा लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कमजोर मनःस्थिती आणि नैराश्य या अशा समस्यांचा मुलांनाही सामना करावा लागतो. या मुलांच्या नैराश्याचे कारण केवळ करिअर आणि घरातील ताणतणाव नसतात.

त्यापेक्षा भावनिक सुरक्षिततेचा अभाव, पालकांकडून योग्य लक्ष न मिळणे किंवा शोषण अशीही अनेक कारणे आहेत, जी मुलांच्या नैराश्याची कारणे असतात. १३ ते १५ वर्षे वयोगटातील प्रत्येक चार मुलांपैकी एक मूल तणावपूर्ण मनःस्थितीतून जात असल्याची सद्यःस्थिती आहे. ते वय असे असते की, जेव्हा मूल जग, नातेसंबंध, समाज, स्वतःचे-परके, बरोबर-अयोग्य अशा गोष्टी शिकत असते. अशा परिस्थितीत नैराश्यामुळे त्याला योग्य मार्ग मिळाला नाही तर तो भरकटत जाऊ शकतो. त्यामुळे पालकांनी त्या काळात मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे खूप गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

मुलांमध्ये नैराश्य का येते?

आरोग्य समस्यांमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन देखील अशा प्रकारे होते की, व्यक्ती प्रथम चिंता आणि नंतर नैराश्याच्या आहारी जाते. अंतर्गत कारणांमध्ये जाणीवपूर्वक आणि चुकीची विचार पद्धती हे देखील नैराश्याचे एक कारण आहे. जेव्हा नकारात्मक विचार सतत येतात, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. बाह्य कारणांमध्ये सामाजिक-आर्थिक, दुर्लक्षित होणे, पालकांचे लक्ष न मिळणे, गुंडगिरीला बळी पडणे, शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अत्याचाराचा देखील समावेश आहे.

वेळेत ओळखा, मुलांमधील नैराश्याची लक्षणे...

  • अचानकपणे वजन वाढणे किंवा जलदगतीने वजन कमी होणे

  • खेळांचा त्याला आनंद मिळत नसेल किंवा तो मित्रांसोबत कमी वेळ घालवतो

  • झोपच लागत नाही किंवा नेहमीच जास्त झोप येणे

  • आत्मविश्वासाचा अभाव; काही चांगले घडले तरी आनंद वाटत नाही

  • रागाने वस्तू फेकणे, मोठ्याने ओरडणे; कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे

  • स्वतःला इजा किंवा इतरांना दुखापत करणे; आत्महत्येचे विचार किंवा त्याबद्दल बोलणे

  • मूल गप्प व उदासीन राहते. नेहमी गप्प राहते. कोणत्याही गोष्टीवर सहज रडतो

मुलांना नैराश्यापासून वाचविण्यासाठी...

  • पालकांनी मुलांसोबत प्रेमाने वागावे; प्रत्येक प्रसंगात तुम्ही सोबत असल्याची जाणीव करून द्या

  • मुलांना आवर्जून वेळ द्या, त्याच्याशी बोला, खेळा किंवा त्याला फिरायला घेऊन जा

  • मुलाच्या शिक्षकांना भेटा, त्यांच्याशी संवाद ठेवा आणि मुलाविषयी जाणून घ्या

  • कोणत्याही चुकीसाठी मुलाला रागावू नका किंवा वारंवार शिव्या देऊ नका

  • मूल भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जाते, त्यावेळी त्याला धीर द्या, प्रेरणादायी गोष्टी सांगा

मुलांना तुम्ही सोबत असल्याचा आत्मविश्वास द्या

मुलाला काही अडचण आली तर त्यातून बाहेर कसे पडायचे, याचे उपाय सांगून त्याला धीर द्यावा. नापास झाल्यावर त्या मुलाचे खच्चीकरण करण्यापेक्षा पुढील पर्याय सांगून त्याचा आत्मविश्वास वाढवावा. मुलांसोबत सुसंवाद ठेवा, त्यांना पुरेसा वेळ द्या, जेणेकरून त्याला पालक आपल्यासोबत असल्याची खात्री होईल.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.