कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण नवलखा, तेलतुंबडे यांना दिलासा 

मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर 26 ऑक्‍टोबरला सुनावणी घेण्यात येईल, असे न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. 

सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांना अटक न करण्याबाबत आधीच दिलासा देत 26 ऑक्‍टोबरपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती सरकारी वकील अरुणा कामत-पै यांनी खंडपीठाला दिली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी नवलखा आणि तेलतुंबडे यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल केला होता. कोणतेही पुरावे नसताना या प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करून पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे; तर तेलतुंबडे यांनीही घरावर छापे घालून संशयावरून चौकशीसाठी प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) केल्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com