अरे देवा..! इथे मृत्यूनंतरही आत्म्यांना वाट पाहावी लागतेय मोक्षप्राप्तीसाठी; नातेवाईकही हळहळताहेत 

Asthi
Asthi

सोलापूर : मृत्यूनंतर आत्म्याला मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी नदी किनारी पिंडदान व अस्थिविसर्जन विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा, असा धार्मिक संकेत आहे. मात्र सोलापुरातील लॉकडाउनमुळे गेल्या चार महिन्यांपासून येथील मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अस्थिंचे विसर्जन करता न आल्याने मृत व्यक्‍तींच्या नातेवाइकांच्या दु:खात आणखी भर पडत आहे. तर मृत्यूनंतरही मृत्यात्म्यांना मोक्षप्राप्तीसाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र येथील स्मशानभूमींमध्ये शेकडोंच्या संख्येने बांधलेल्या अस्थिकलशांवरून दिसून येत आहे. 

कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी सोलापुरात 22 मार्च ते 5 जून व 17 ते 26 जुलै असा दीर्घ लॉकडाउन करण्यात आला होता. यादरम्यान शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येत होते. प्रशासकीय नियमानुसार ठराविक लोकांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात येत होते. अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीला मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी अस्थिंचे विसर्जन करणे हिंदू धर्मशास्त्रानुसार आवश्‍यक असते. मात्र 22 मार्चपासून चार महिने या कालावधीत ज्यांचे निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र त्यांच्या अस्थि मोक्षप्राप्तीची वाट पाहात आहेत. कारण, सोलापूर शहरात लॉकडाउन असल्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी किंवा शहरानजीकच्या नदींमध्ये अस्थिविसर्जन करण्यासाठी जाता येत नाही. शहरातील लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पंढरपूर शहरात लॉकडाउन सुरू झाला. तसेच नाकाबंदीमुळे व दळणवळणावर बंदी असल्यामुळे मृतांच्या नातेवाइकांसमोर अस्थिविसर्जन करायचे कसे, असा प्रश्‍न पडला आहे. 

पंढरपूर तीर्थक्षेत्रीच अस्थिविसर्जनाला देताहेत नातेवाईक प्राधान्य 
पूर्वभागातील पद्मशाली समाजाच्या शांती धाम येथील स्मशानभूमीत महिन्याकाठी 90 ते शंभर मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार होतात. गेल्या चार महिन्यांत मृत्यू झालेल्यांच्या अस्थि मडक्‍यात बांधून येथील एका खोलीत ठेवण्यात आलेल्या आहेत. या अस्थिकलशांची संख्या जवळपास साडेतीनशे ते चारशे एवढी आहे. तसेच या परिसरातील इतर समाजाच्या स्मशानभूमीतही यादरम्यान अनेक अंत्यसंस्कार झाले आहेत. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्येच अस्थिविसर्जन केल्यास मृतात्म्याला मोक्ष प्राप्त होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, या अपेक्षेने मृतांचे नातेवाईक पंढरपुरातील लॉकडाउन शिथिल होण्याची वाट पाहात आहेत. मात्र काही नातेवाईक अस्थिविसर्जनाशिवाय घरात शुभकार्य करता येणार नाही, म्हणून नुकत्याच संपलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाउननंतर शहरानजीकच्या हत्तूर कुडल संगम व वडगबाळ येथील बार्शी पुलाखालील सीना नदीच्या पात्रात अस्थिविसर्जन करण्यासाठी जात आहेत. मात्र तरीही स्मशानभूमीतील अस्थिकलशांची संख्या पाहता, मृत व्यक्तींचे नातेवाईक चंद्रभागा नदीतच अस्थिविसर्जन करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते. 

याबाबत पूर्वभागातील पुरोहित निरंजन कुडक्‍याल म्हणाले, वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीमध्ये अस्थिविसर्जन करण्याची प्रथा आहे. यामुळे मृतात्म्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. पण लॉकडाउनमुळे अस्थिविसर्जन करता येत नसल्याने व चार-पाच महिने वाट पाहणे योग्य नसल्याने शहरानजीकच्या तेरा मैल परिसरातील सीना नदीच्या पात्रात अस्थि विसर्जित केल्या जात आहेत. 

येथील रमेश गाजूल यांचा 2 जून रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्याही अस्थिंचे विसर्जन करण्यात न आल्याबद्दल त्यांच्या पत्नी राधिका गाजूल म्हणाल्या, माझ्या पतीला मोक्षप्राप्ती व्हावी, त्यांना सद्‌गती मिळावी यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपुरातील चंद्रभागा नदीत त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्याचे आम्ही ठरवले आहे. मात्र लॉकडाउनमुळे व वाहनांची सोय नसल्यामुळे पंढरपूरला जाता येईना. 

पद्मशाली समाजाच्या शांती स्मशानभूमी येथील अंत्यसंस्कार साहित्याचे पुरवठा करणारे वेणुगोपाल कोडम म्हणाले, या स्मशानभूमीत महिनाभरात 90 ते 100 अंत्यसंस्कार होतात. या लॉकडाउनच्या काळात साडेतीनशे ते चारशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र लॉकडाउनमुळे त्यांच्या अस्थिंचे विसर्जन न झाल्यामुळे येथील सभागृहात त्यांचे अस्थिकलश बांधून ठेवण्यात आले आहेत. आता लॉकडाउन संपल्याने शेजारील नदीमध्ये काहीजण अस्थिंचे विसर्जन करण्यासाठी अस्थिकलश घेऊन जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com