लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज जाहीर करण्यात आले. यामध्ये राज्यात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.
ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा, आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. येथे महायुतीचा भगवा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा हा बालेकिल्ला आबाधित राहिला. जनतेने ठाण्यात विकासाला मतदान केलं. राज्य सरकारने दोन वर्षात केलेलं काम आणि मोदी सरकारने १० वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या रुपाने मिळाल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणेकरांनी विरोधकांचा कार्यक्रम केला आहे, त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी नरेंद्र मोदी यांचं देखील अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनत आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
शिवसेना एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे. लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन केलं जाईल. इंडिया आघाडी मोदी हटाव या एकाच द्वेशाने पछाडलेले होते. ते मोदींना तडीपार करण्याची भाषा करत होते, पण देशातील जनतेने विकासाला मतदान करत तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलं आहे. विकासाचं राजकारण यापुढेही असणार आहे. या देशातील जनतेने मोदींना पसंती दिली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यात विरोधकांनी जो काही प्रमाणात अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. लोकांचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कुठं कमी पडलो याचा विचार आम्ही करू. त्यामध्ये दुरुस्ती करू असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.