
Maharashtra Budget Session: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; भर विधानसभेत अजित पवार भडकले
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशातच अद्याप पंचनामे झाले नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पंचनाम्यावरुन विरोधकांची सभात्याग केली आहे. (Maharashtra Budget Session Ajit Pawar angry )
विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झालेलं नुकसान आणि कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला सुनावलं. भर विधानसभेत अजित पवार भडकल्याचे पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे आदेश काढण्याची मागणीदेखील केली.
काय म्हणाले अजित पवार?
अधिवेशन चालू असताना कुठे काही मनुष्यहानी झाली, तर स्थगन घेतला जातो आणि चर्चा करतो. शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. सात दिवस झाले तरीही कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.
गारपीट, अवकाळी पावसाने शेतमालांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षरशः शेतकरी आडवा झालेला असताना पंचनामे करायला कुणी नाहीये. असं म्हणत अजित पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.
मला सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करायचं आहे की, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, पण ज्या नैसर्गिक संकटात शेतकरी अडकलेला आहे. त्या शेतकऱ्याला माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यासाठी त्या-त्या भागात तरी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावं आणि पंचनामे करावेत.
नांदेडमध्ये तुफान गारपीट झालेली आहे. मराठवाड्यात हा आकडा वाढत चाललेला आहे. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कित्येक जनावर मृत्यूमुखी पडली आहेत. अंगावर वीज पडून विदर्भातही जीवत आणि पशुधन हानी झाली आहे.
अधिवेशन जेव्हा चालू असतं तेव्हा सर्वांचं लक्ष सभागृहाकडं असतं. इथे आपला मुद्दा उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल. हे एकमेकांशी निगडित झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कर्मचारी संपावर आहेत. दुहेरी कात्रीत महाराष्ट्र अडकलेला असताना, त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका दाखवायला पाहिजे.
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
आम्ही सातत्याने सत्ताधारी आमदार काय बोलताहेत हे लक्षात आणून देतोय. एक सरकारी पक्षाचे आमदार म्हणाले, 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामची कमाई आहे. पटत का हे? संजय गायकवाड यांनी हे विधान केलं.
पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही कळत, पण तुम्ही सगळ्यांना एका मोजमापात धरायला लागलात आणि ते नाउमेद झाले, तर राज्य चालणार कसं? असा संतप्त सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच, विदर्भातील एका गावातील ग्रामस्थांनी स्वतःच शाळा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश काढले पाहिजेत, त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही," अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला सुनावलं.